पुणे – पुण्याहून अमृतसरला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाला तब्बल 14 तास उशीर झाला. मध्यरात्री 12 पासून ते बुधवारी दुपारी 2 वाजेपर्यंत प्रवासी विमानतळावर ताटकळत बसले होते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि चिमुकल्यांचे हाल झाले. पुणे विमानतळावरून बुधवारी पहाटे इंडिगोचे 6 ई-721 हे विमान अमृतसरला सुटणार होते. त्यासाठी मध्यरात्री बारा वाजल्यापासून 170 प्रवासी विमानतळावर आले होते. पण, अमृतसर येथून येणारे विमान पुण्याला आले नाही. त्यामुळे सुरवातीला विमानाला उशीर होईल असे प्रवाशांना सांगण्यात आले. पण, बुधवारी दुपारचे 12 वाजले तरी विमान अमृतसरला सुटले नाही. रात्रभर विमानतळावर थांबून वैतागलेल्या प्रवाशांनी इंडिगोच्या प्रशासनाला दुसरे विमान सोडण्याची मागणी केली. अथवा कनेक्टिंग फ्लाइटद्वारे प्रवाशांना सोडण्याची मागणी केली. पण, अमृतसर येथे हवामान खराब असून ते विमान पुण्यात आल्याशिवाय येथून विमान सुटणार नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, दुपारी दोन वाजता इंडिगोने दुसऱ्या विमानाची सोय केली. त्यानंतर तीन वाजता विमानाने उड्डाण केले. अमृतसरला जाण्यासाठी पहाटे 2 वाजून 55 मिनिटांनी विमान सुटणार होते. पण, सुरुवातीला साडेचार वाजता विमान सुटेल असेल सांगण्यात आले. त्यानंतर पुन्हा सतत वेळेत बदल होईल, असे सांगितले. दुपारी बारापर्यंत सात वेळा विमानाची वेळ बदली. शेवटी 2 वाजता सर्व प्रवाशांना घेऊन विमानाने उड्डाण केले. आम्ही रात्री बारापासून आलो आहोत. विमानामध्ये अनेक प्रवासी मुंबई, बंगळुरू येथून आलेले होते. विमानतळ प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे आम्हा सर्वांना मनस्ताप सहन करावा लागला. – अनुजा बिनीवाले, प्रवासी