नवी दिल्ली – संसदेच्या पावसाळी अधिवेशनात कॉंग्रेसचे लोकसभेतील नेते अधिररंजन चौधरी यांना बदलून त्यांच्या जागी नवीन नेता आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या असल्याची चर्चा आहे. अधिरंजन चौधरी आणि तृणमुल कॉंग्रेस यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
चौधरी हे पश्चिम बंगालमधून निवडून आलेले खासदार आहेत. या आधीचे कॉंग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिाकार्जून खरगे हे लोकसभेला पराभूत झाल्याने त्यांच्या जागा पश्चिम बंगालचे चौधरी यांना ही संधी मिळाली.
लोकसभेतील सर्वात मोठ्या गटाचे नेते म्हणून त्यांनी लोकसभा अधिवेशनाच्यावेळेला विरोधकांबरोबर व्यवस्थित फ्लोअर मॅनेजमेंट करणे अपेक्षित असते. त्यात चौधरी कमी पडत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यांनी ज्यावेळेला विरोधी पक्षांच्या अशा बैठका बोलावल्या त्यावेळी अनेक वेळा त्यांनी तृणमुल कॉंग्रेसला निमंत्रणच देणे टाळले असे सांगितले गेले.
नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगाल निवडणुकीत कॉंग्रेसने तृणमूल कॉंग्रेसशी हातमिळवणी करावी असा प्रस्ताव होता. तो सर्वं कॉंग्रेसजनांना मान्य होता. पण अधिररंजन चौधरी यांनी तृणमुलशी हातमिळवणी करण्यास प्रखर विरोध दर्शवला.
त्याचे विपरित परिणाम कॉंग्रेसला भोगावे लागले आणि पश्चिम बंगालमधून कॉंग्रेस पार्टी जवळपास हद्दपारच झाली. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता चौधरी यांच्या पदावर गदा येणार असल्याचे जवळपास निश्चीत मानले जात आहे. तथापि त्यांच्या जागा कोणाला आणायचे हा प्रश्न मात्र अजून सुटू शकलेला नाही.