– ज्ञानेश्वर फड
नामसंकिर्तन साधन पै सोपे | जळतील पापे जन्मांतरीची | ठायीच बैसोनि करा एकचित्त | आवडी अनंत आळवावा || असे संत तुकाराम महाराज यांनी सांगितले आहे. यंदाच्या करोनाच्या प्राणघातक संकटाच्या पार्श्वभूमीवर आपल्या घरीच मन एकचित्त करा आणि भक्तीरसात न्हाऊन निघत वैष्णवांनी भगवंताला आळवावे, अशी शिकवण संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा रथापुढे दिंडी क्र. तीनचे विणेकरी ह.भ.प. दिनेश महाराज बकाल यांनी दिली.
बकाल महाराज यांच्याशी आषाढी वारी सोहळ्यानिमित्त “दिंडीवारी” या विशेष कार्यक्रमात दै. प्रभातने संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, जर करोना रोग संसर्गजन्य नसता आणि तो जर एकाद्यालाच होणारा असता तर आपण नामदेवरायांच्या प्रमाणाप्रमाणे, देह जावो अथवा राहो | पांडुरंगी दृढ भावो | चरण न सोडी सर्वथा | आण तुझी पंढरीनाथा || याप्रमाणे आपण वारी केली असती मात्र, हा रोग संसर्गजन्य असल्याने आपल्यामुळे इतरांच्या जीवाला धोका होऊ शकतो. त्यामुळे शासनाच्या नियमाप्रमाणेच आपल्याला वारी करावी लागेल. कायिक, वाचिक आणि मानसिक या तीन प्रकारे वारी करता येते. करोनाच्या संकटामुळे आपल्याला कायिक वारी करता येणार नाही. मात्र आपण आपल्या घरी राहून वाचिक आणि मानसिक वारी करू शकतो. घरीच राहून वाचेने श्री विठ्ठलाचा नामजप करावा, मनाने पांडुरंगाचे स्वरूप आठवून मनोमन पूजा करावी. संतांनी सांगितल्याप्रमाणे भगवंताचा नामजप हेच सोपे साधन आहे. घरिच बसून विठ्ठलाला आपलेसे करावे, असेही बकाले महाराज म्हणाले.
शेडगे दिंडीचा इतिहास आणि परंपरा
शेडगे दिंडी ही संत ज्ञानेश्वर महाराज पालखी रथापुढे तीन क्रमांकाची दिंडी आहे. माऊलींच्या पालखी सोहळ्याचे प्रवर्तक हैबत बाबा यांचे शिष्य शेडगे बाबा यांनी या दिंडीची सुरूवात केली. या दिंडीचा उमग माऊलींच्या सोहळ्यापासून आहे. इ.स. 1832 पासून दिंडीचा प्रवास सुरू झाला. दिंडीला 1917 पासून सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचा घनिष्ट संबंध आला. जोग महाराज आणि त्यांचे शिष्य मामासाहेब दांडेकर हे देखील याच दिंडीत चालत असत. त्यामुळे या दिंडीली आगळेवेगळे स्थान आहे. वारकरी शिक्षण संस्थेचे विश्वस्त शांतिब्रम्ह मारोती महाराज कुऱ्हेकर हे देखील या दिंडीत चालतात. सध्या जयसिंग दादा मोरे हे या दिंडीचे मालक असून ते परंपरा चालवत आहेत. भजनाची जबाबदारी मारोती महाराज कुऱ्हेकर, गाथा मंदिराचे अध्यक्ष पांडुरंग महाराज घुले, वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक, विद्यार्थी मंडळी पार पाडत असतात. या दिंडीत पुणे, मुंबई, धुळे, बुलढाणा, जळगाव, औरंगाबाद, या जिल्ह्यांसह संपूर्ण महाराष्ट्रातील भाविक, वारकरी असतात. दिंडीत जवळपास अडिच हजार वारकरी चालतात. विषेश म्हणजे दिंडीत पाचशे जण हे टाळकरी, भजनकरी असतात. दिंडीचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे विणेकरी जोपर्यंत अभंग म्हणण्यास सांगत नाहीत तोपर्यंत कोणीही अभंग म्हणत नाहीत. तसेच पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये यासाठी भोजनासाठी पत्रावळी न वापरता स्टीलची भांडी वापरली जातात असा नियम आहे. सन 2017 मध्ये या दिंडीला निर्मल ग्राम पुरस्कार प्राप्त झाला आहे.
पायी वारी असती तर… आजचा मुक्काम – पुणे