वाई – करोनामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. लॉकडाऊनमुळे सर्वकाही बंद असल्याने मोलमजुरी करणाऱ्यांवर मोठे संकट ओढावले आहे. या परिस्थितीत मतदार संघातील कोणताही गोरगरीब उपाशी राहू देणार नाही, असे आश्वासन आ. मकरंद पाटील यांनी दिली. दरम्यान, मतदार संघातील वाई, खंडाळा, महाबळेश्वर या तीनही तालुक्यातील पाण्याचा, चाऱ्याचा प्रश्न मार्गी लावणाऱ्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
करोनाच्या पार्श्वभूमीवर आ. मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली वाई तहसीलदार कार्यालयात पार पडलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.दैनंदिन लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी वाईच्या प्रांत अधिकारी संगीता राजापूरकर, तहसीलदार रणजीत भोसले, वाई नगरपालिकेच्या मुख्याधिकारी विद्या पोळ यांच्यावर सोपवली आहे. त्याचे वितरण व नियोजन कशा पद्धतीने चालू आहे, याचा आढावा घेण्यासाठी आमदार मकरंद पाटील यांच्या अध्यतेखाली तहसीलदार कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
आ. मकरंद पाटील म्हणाले, जनतेने प्रशासनाला या आपत्कालीन परिस्थितिचा सामना करण्यासाठी सहकार्य करून स्वतःचीही काळजी घेतली पाहिजे, पुण्या-मुंबईसह बाहेर शहरांमधून आलेल्यांनी प्रशसनाच्या आदेशांचे पालन करावे, अन्यथा त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार आहेत. तसेच विनाकारण घराबाहेर पडून रस्त्यांवर फिरु नका, प्रशासनाला सहकार्य करा, असे आवाहनही आ. पाटील यांनी यावेळी केले.
प्रांत, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, गावकामगार तलाठी, मंडल अधिकारी, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका व आशाताई एवढी मोठी यंत्रणा स्वतःचा प्रपंच सोडून 24 तास जनतेच्या सेवेसाठी व प्रशासनाच्या आदेशाचा आदर करत गावोगावच्या जनतेची काळजी घेताना दिसत आहेत, त्यामुळे जनतेने अजून काही दिवस सहकार्याची भूमिका ठेवावी.
तीन तालुक्यातील गावागावामध्ये स्वस्त धान्य दुकानांमधून शिधापत्रिका धारकांना एप्रिल आणि मे महिन्याचे धान्यवाटप सुरू झाले आहे. त्यामुळे जनतेवर उपासमारीचे संकट कोसळणार नाही, याचीही प्रशासनाने काळजी घेतली आहे.