कोलकाता: देशात करोनाची दुसरी लाट अजून ओसरली नाही, याच पार्श्वभूमीवर करोना लसीकरणाचा वेग देशात वाढवण्यात आला आहे. मात्र लसींच्या कमतरतेमुळे देशव्यापी लसीकरण मोहिमेचा वेग मंदावल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक राज्यांकडून केंद्र सरकारला लसींच्या पुरवठ्याबाबत विनंती केली जात आहे. त्यातच आता या लसीवरून एका राज्यात राजकारण सुरु झाले असल्याचे दिसत आहे.
राज्यात लसींचे ९ लाख डोस फुकट घालवले आहेत आणि दुसरीकडे आता केंद्रातील मोदी सरकारकडे आणखी करोना लसींची मागणी करायची, अशी टीका करण्यात आली आहे.पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पुन्हा एकदा करोना लसीसंदर्भात तक्रार केली आहे. यासंदर्भात त्यांनी पंतप्रधान मोदींना पत्रही लिहिले आहे. यावरून भाजपचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी सरकारवर निशाणा साधला आहे.
ममता बॅनर्जी यांच्या सरकारने राज्यात राबवलेली धोरणे पक्षपाती आहेत. राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे लसीकरणाचा वेग मंदावला आहे. नागरिकांना लस घेण्यात मोठ्या अडचणी येत आहेत, असे सांगत ममता बॅनर्जी सरकारने कोरोना लसीचे ९ लाख डोस फुकट घालवल्याचा दावाही सुवेंदू अधिकारी यांनी केला आहे. तसेच आपल्या आधीच्या दाव्यांपासून ममता बॅनर्जी यांनी घुमजाव केले आहे.
सरकारी यंत्रणांच्या फोलपणाचे खापर केंद्रातील मोदी सरकारवर फोडले जात आहे, अशी टीकाही अधिकारी यांनी केली. तृणमूल काँग्रेसच्या सरकारने काही लाख लसी खरेदी केल्या आहेत. सरकारच्या चुकीच्या धोरणांचा परिणाम राज्यातील १० कोटी जनतेवर पडत आहे. तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते आणि जवळच्या लोकांना लसींसाठी पायघड्या घातल्या जात आहेत, तर सामान्य जनता रांगेत ताटकळत उभी राहते, असा दावा अधिकारी यांनी केला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अलीकडेच पंतप्रधान मोदींशी झालेल्या भेटीतही कोरोना लसीचा मुद्दा उपस्थित केला होता. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत, आज मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ग्लोबल अॅडव्हायजरी बोर्डाची बैठक घेतली. यावेळी नोबेल विजेते अभिजित बॅनर्जीही उपस्थित होते. गुजरात, यूपी आणि कर्नाटक या राज्यांना मुबलक प्रमाणात कोरोना लसी मिळाल्या आहेत. मी लोकांमध्ये भेदभाव करत नाही. पश्चिम बंगालला लोकसंख्येच्या घनतेनुसार कमी लसी मिळाल्या आहेत. मी केंद्र आणि पंतप्रधान मोदींना विनंती करते, की राज्या-राज्यांमध्ये भेदभाव करू नका, असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या.