राजगुरूनगर – राज्य मंत्रिमंडळ विस्तारात खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाला पुन्हा वगळल्याने या मतदारसंघाचा राजकीय वनवास अद्यापही कायम असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. खेड तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या घड्याळाची “टिकटिक’ कायम आहे, तरीही खेडच्या नशिबी साधे राज्यमंत्रीपदही येऊ नये ही मोठी शोकांतिका म्हणावी लागेल.
महाराष्ट्राची विधानसभा अस्तित्वात आल्यापासून ते आजपर्यंत जिल्ह्यातील खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघ सोडून सगळ्या मतदारसंघाला कोणत्या ना कोणत्या सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी मिळाली; पण खेडला मिळाली नव्हती. आमदारकीचा 10 वर्षांचा अनुभव व शरद पवार यांचे विश्वासू म्हणून आमदार दिलीप मोहिते यांची ओळख आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा त्यांच्या गळ्यात आमदारकीची माळ पडली, त्यामुळे यंदा तरी आमदार दिलीप मोहिते पाटलांच्या रूपाने खेड तालुक्याला “लाल दिवा’ मिळेल, अशी आस मोहिते पाटील समर्थकांसह खेड तालुक्याला होती; मात्र महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांना स्थान न मिळल्याने आणखी कितीकाळ तालुक्याने वनवास भोगायचा असा सवाल उपस्थित केला जात आहे.
चाकण एमआयडीसी, खेड, आळंदी, चाकण नगरपालिकेमुळे तालुका आर्थिक सक्षम बनला आहे. तसेच ऐतिहासिक, पर्यटन स्थळे, तीन धरणांमुळे तालुक्याचे राज्यात वेगळे स्थान निर्माण झाले आहे. तरीही राजकीयदृष्ट्याही महत्त्वाचे स्थान तालुक्याला कायम नाकारण्यात आले. दरम्यान, जिल्ह्यात खेड तालुका वगळता जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये साखर कारखाने आहेत. त्यामुळे खेड तालुक्यातही साखर कारखाना उभारावा, अशी मागणी माजी आमदार स्व. नारायण पवार यांनी त्यांच्या कारकिर्दित केली होती; मात्र कारखान्याची परवानगी नाकारत त्यांचा उपहास करण्यात आला.
त्यामुळे नारायण पवारांनी बंड केले. तेव्हापासून चालत आलेला बंड नागरिकांनी गेल्या 15 वर्षांपासून कायम ठेवला असल्याचे आतापर्यंतच्या निकालावरून स्पष्ट होत आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपच्या मतविभागणीमुळे दिलीप मोहिते निवडून आले. दोनदा निवडून आलेल्या आणि आधी जिल्हा परिषद अध्यक्षपद भूषविणाऱ्या दत्ता भरणेंना मंत्रिपद मिळते; मात्र तिसऱ्यांदा निवडून आल्यावरही मोहितेंना मंत्रिपद मिळत नाही, यावरून राष्ट्रवादीला खेडबद्दल काही आकस आहे का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
नेते, पदाधिकारी “शो’पीस?
जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा अपवाद वगळता खेड तालुक्याच्या पदरी कायमच राजकीय उपेक्षा पडली आहे. खेड तालुक्याला जिल्हा परिषदेत महत्त्वाच्या समित्या फारशा कधी वाट्याला आल्या नाही. तसेच कधी महामंडळ, लोकसभेची उमेदवारी तालुक्याच्या वाट्याला आलेली नाही. तर आजतागायत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्षपद मिळाले नाही. पक्षीय पातळीवरही फारशी मोठी पदे कधी तालुक्याला मिळाली नाहीत. पक्षाचे जिल्हा अध्यक्षपदही तालुक्याला कधी देण्यात आलेले नसल्याने तालुक्यातील राजकीय नेते, पदाधिकारी “शो’पीस आहे का? अशी टिप्पणी आता राजकीय वर्तुळात होत आहे.
जयंत पाटील यांनी दिलेला “शब्द’
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष तथा मंत्री जयंत पाटील यांनी वाडा येथे दिलीप मोहिते यांच्या प्रचारार्थ सभा घेतली होती. यात ते म्हणाले होते की, दिलीप मोहितेंना तुम्ही निवडून द्या, सत्ता आल्यास राज्य सरकारमध्ये त्यांना विशेष स्थान देऊ. त्यामुळे पाटील आपला शब्द पाळतील आणि खेडच्या वाट्याला यंदातरी प्रथम “लाला दिवा’ मिळेल अशी आशा होती; मात्र मंत्रिमंडळ विस्तारात मोहिते पाटलांना स्थान न मिळल्याने जयंत पाटलांचा शब्द खोटा ठरल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे.