– जीवन मांढरे (प्रतिनिधी)
मांढरदेव – मांढरदेव येथे लागलेल्या वणव्याच्या आगीमध्ये येथे जल जीवन योजनेअंतर्गत आलेले प्लॅस्टिकचे पाइप जळून मोठे नुकसान झाले. केंद्र सरकारच्या माध्यमातून भारतातील वीस हजार गावांमध्ये जल जीवन अभियान योजने अंतर्गत पाणीपुरवठा करण्याचे काम सुरू असून,
त्याच योजच्या माध्यमातून मांढरदेवी येथे धोम धरणातून पाणी आणण्याचे काम काही महिन्यांपासून सूरू झाले असून त्यासाठी लागणारे लोखंडी तसेच प्लॅस्टिकचे पाइप याठिकाणी आणून जागोजागी कामाच्या गरजेनुसार ठेवण्यात आले आहेत.
मांढरदेव येथील परिसर डोंगराळ भाग असून या भागात उन्हाळ्यात वणवे लागण्याचे प्रमाण जास्त असते. संपूर्ण डोंगर परिसर वणव्यामुळे काळाकुट्ट झाल्याचे या दिवसात पाहवयास मिळते. त्यातच एमटीडीसी प्रकल्पाच्या पश्चिमेस कोणी अज्ञात व्यक्तीकडून वणवा लावण्यात आला.
तो वणवा पेटत-पेटत एमटीडीसी प्रकल्पापर्यंत आला. आणि तेथे ठेवलेल्या प्लॅस्टिकच्या पाईपने पेट घेतला. काही क्षणातच पाइपने एवढा पेट घेतला की संपूर्ण मांढरदेव परिसर धुराने काळाकुट्ट झाला. अगोदरच योजनेचे काम खूप संथ गतीनी सुरू होते. आणि त्यातच हे नवीन आलेले संकट पाहता मांढरदेवमधील पाणी प्रश्न मार्गी लागणार की नाही याबाबतची चिंता ग्रामस्थांनी वाटू लागली आहे.