हिंगोली – सध्याचे सरकार हे घटनाबाह्य व स्थगिती सरकार असून गेल्या सात महिन्यांपासून सातत्याने महापुरूषांचा अपमान केला जात आहे. सातत्याने दादागिरी, मारहाणीचा प्रकार घडतो आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्था कोलमडली आहे. सत्तेची मस्ती डोक्यात गेलेल्या गद्दारांना महाराष्ट्रातील जनता माफ करणार नाही, अशी टिका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथे आयोजित कार्यक्रमात केली.
औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथे आमदार राजु पाटील नवघरे यांच्या प्रयत्नाने 32 कोटी रूपयांच्या मंजूर झालेल्या आदिवासी मुला-मुलींची आश्रम शाळेचा पायाभरणी सोहळा, शेतकरी व कार्यकर्ता मेळाव्यास विरोधी पक्षनेते अजित पवार बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर तर कार्यक्रमास माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा, आमदार विक्रम काळे, माजी आमदार डॉ. संतोष टारफे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, अ. हाफीज, मुनीर पटेल, अजित मगर, सतीश पाचपुते, आंबादास भोसले आदींची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टिका केली. सध्याचे सरकार घटनाबाह्य व स्थगिती सरकार आहे. सत्तेची मस्ती डोक्यात गेली न पाहिजे. जनता ही राजा आहे ती कुणालाही सत्तेत बसवते व कुणालाही उठविते. या सरकारमधील काही आमदार गेल्या सात महिन्यांपासून दादागिरी, धमक्या, बळजबरी, अधिकारी व कर्मचार्यांना मारहाण करीत आहेत.
महिला आमदारांना मारहाण होत आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्था कोलमडली आहे. सात महिन्यांपासून मंत्रीमंडळाचा विस्तार झाला नाही. मंत्रीमंडळात एकाही महिलेला स्थान दिले नाही. येणार्या काळात महाराष्ट्रातील जनता ही गद्दारांना माफ करणार नाही त्यांना निवडणुकीत त्यांची जागा नक्की दाखवू, असा विश्वास अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केला.
माजी सहकार राज्यमंत्री दांडेगावकर यांनी सांगितले की, आदिवासी आश्रम शाळेचे काम रोखण्यासाठी व हा निधी इतरत्र वळविण्यासाठी खुप प्रयत्न केले. परंतू, आमदार राजु पाटील नवघरे यांनी न्यायालयात व विधानसभेत हा मुद्दा रेटून धरत निधी मंजूर करून घेतला. आ. नवघरे हे नुसते आमदार नसून दमदार आमदार असल्याचे त्यांनी सांगितले.