मुंबई :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रासाठी भरीव तरतूद केली आहे. महाराष्ट्रातील रेल्वे विकासासाठी १३ हजार ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामध्ये राज्यातील १२४ रेल्वे स्थानकांचा विकास करण्यात येणार आहे.
नाना शंकरशेठ यांनी पहिली रेल्वे सुरू केली होती आणि त्याची नोंद इतिहासात घेतली गेली आहे. त्याचप्रमाणे रेल्वे आधुनिकीकरण आणि विस्तारीकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकावर मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते साईनगर शिर्डी शहरांदरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेस या वेगवान रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाप्रसंगी उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते साईनगर शिर्डी शहरांदरम्यान धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस गतीने धावेल आणि महाराष्ट्रातील जनतेला आणि भाविकांना आनंद मिळेल. मुंबई आणि पुणे यासह अनेक शहरांना जोडण्यासाठी वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात आल्याने याचा लाभ व्यापारी, विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी, सामान्य नागरिकांना होणार आहे. असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
#VandeBharatExpress : ‘वंदे भारत’ एक्सप्रेस भारताच्या विकासाचे प्रतीक – पंतप्रधान मोदी
दरम्यान, ‘वंदे भारत’ एक्सप्रेस मधून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. यावेळी एका विद्यार्थिनीने वंदे भारत वर रचलेल्या संस्कृत कवितेचे पंतप्रधान यांनी कौतुक केले.