मुंबई : नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला १३ हजार ५०० कोटी रुपये असा आजवर कधीही नव्हता इतका भरीव निधी मिळाला आहे. त्यामुळे राज्यातील रेल्वे प्रकल्प गतीने पूर्ण होतील आणि लाखो प्रवाशांना फायदा मिळेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकावर मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते साईनगर शिर्डी शहरांदरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेस या वेगवान रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.
मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, सिंचन, रस्ते प्रकल्प, कृषी, पायाभूत सुविधा, गृहनिर्माण, स्टार्टअप, या सर्व क्षेत्रात महाराष्ट्रासाठी या केंद्रीय अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली असून भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरची करण्याचा जो निर्धार प्रधानमंत्र्यांनी केला आहे. त्यात महाराष्ट्रही आपले एक ट्रिलियनचे योगदान देण्यासाठी प्रयत्न करेल.
#VandeBharatExpress : ‘वंदे भारत’ एक्सप्रेस भारताच्या विकासाचे प्रतीक – पंतप्रधान मोदी
नुकत्याच झालेल्या एका जागतिक सर्वेक्षणात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वात लोकप्रिय नेते असल्याचे जाहीर झाले आहे, ही देशवासीयांसाठी गौरवाची बाब आहे. प्रधानमंत्र्यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे उद्घाटन केले होते, त्यानंतर मुंबईत मेट्रोची त्यांनी सुरुवात केली आणि आता वंदे भारत एक्स्प्रेसचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होत आहे. अशाच रीतीने एमटीएचएल, मेट्रोचे इतर मार्ग, मुंबई ते पुणे मिसिंग लिंक असे प्रकल्पही लवकरच सुरू होतील आणि त्यासाठी पंतप्रधान मोदी यांना निमंत्रित करण्यात येईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.