जयपूर – कॉंग्रेसमध्ये बंड घडवून आणल्याबद्दल सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी झाली होती. तथापि त्यांनी आपली बंडाची तलवार म्यान करून पुन्हा कॉंग्रेसशी जुळवून घेतले आहे. त्यांची मंत्रिमंडळात कधी वापसी होणार याची आता उत्सुकता आहे. त्याविषयी पायलट यांना पत्रकारांनी आज विचारले असता ते म्हणाले की कोणी कोठे काम करायचे याचा निर्णय पक्ष घेईल आणि आपल्या बाबतीत पक्षश्रेष्ठींकडून जो निर्णय दिला जाईल तो आपल्याला मान्य असेल. पक्षाने यासाठी तीन सदस्यांची समिती नेमली असून त्यात या साऱ्या विषयांची उकल होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ही समिती जो रोडमॅप ठरवले त्यानुसार राजस्थानात पक्षाचे कार्य व कृती केली जाईल असे ते म्हणाले. पायलट यांच्याशी तडजोड करताना कॉंग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांनी त्यांचे म्हणणे, ऐकून घेण्यासाठी ही तीन सदस्यांची समिती नियुक्त केली आहे.
पायलट म्हणाले की, पक्ष आणि सरकार यांच्यात समन्वय असला पाहिजे अशी आमची भूमिका आहे त्यासाठी पक्षाचे निरीक्षक अजय माकन हे सर्वांशी चर्चा करीत आहेत असेही त्यांनी नमूद केले. पायलट हे आता आपल्या मतदार संघातील नागरिकांशी चर्चा करण्यासाठी तेथे दौऱ्यावर जात आहेत.