24 तासांत देशात 1,092 तर महाराष्ट्रात 422 रुग्णांचा मृत्यू
नवी दिल्ली – देशभरात कोविड संसर्गातून बरे झालेल्यांची संख्या 20 लाख 37 हजारावर गेली आहे. त्यामुळे या संसर्गातून बरे होण्याऱ्या रुग्णांचे प्रमाण 73.64 टक्के एवढे झाले असल्याचे, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.देशात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 27 लाख 67 हजार 273 झाली असून सध्या देशात 6 लाख 76 हजार 514 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
त्याचबरोबर गेल्या 24 तासांत 60,091 इतक्या सर्वाधिक संख्येने रुग्ण बरे झाले आहेत. एका दिवसात इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे झाले आहेत. इतक्या मोठ्या संख्येने कोविड -19 रुग्ण बरे होऊन घरी परतल्यामुळे तसेच गृह विलगीकरण पूर्ण केल्यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर 73 टक्के इतक्या नव्या उच्चांकावर पोहचला असून मृत्युदरातही घट झाली आहे.
आतापर्यंत 52 हजार 889 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचे हे प्रमाण 1.91 टक्के झाले असल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. गेल्या 24 तासांत 1 हजार 92 रुग्णांचा मृत्यू झाला असून यात सर्वाधिक महाराष्ट्रातील 422 मृतांचा समावेश आहे.
सलग दुसऱ्या दिवशी आठ लाखांहून जास्त चाचण्या
भारताने सलग दुसऱ्या दिवशी आठ लाखांहून जास्त कोविड नमुन्याच्या चाचण्या पूर्ण केल्या आहेत. चाचण्यांची संख्या प्रतिदिन दहा लाखांपर्यंत नेण्याचा देशाचा निर्धार कायम आहे. गेल्या 24 तासांत 8 लाख 01 हजार 518 नमुन्यांच्या चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंतच्या एकूण चाचण्यांची संख्या 3 कोटी 17 लाख 42 हजार 882 झाली आहे.
दर दहा लाख लोकसंख्येमागे केल्या जाणाऱ्या चाचण्यांच्या संख्येतही लक्षणीय वाढ होऊन ती 23 हजार 002 पर्यंत पोहोचली आहे. देशभरातल्या खासगी व सरकारी प्रयोगशाळांचे जाळे बळकट करण्यात आले असून आज त्यांची संख्या वाढून 1,486 झाली आहे. त्यात 975 प्रयोगशाळा सरकारी व 511 प्रयोगशाळा खासगी आहेत.