पुणे – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि माजी मंत्री सचिन अहिर यांनी दोन दिवसापूर्वी शिवबंधन हातात घेत शिवसेनेत प्रवेश घेतला. तसेच राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी आज फेसबुक पोस्टद्वारे खोचक टीका केली आहे.
रोहित पवार यांनी ट्विट केले आहे की,’ संधी आणि संधीसाधू या दोन शब्दात खूप मोठ्ठा फरक आहे. पक्षाने संधी दिली आणि ते संधीसाधू ठरले. आजही नेत्यांच्या नावापुढे राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्या किंवा नेते असं लावलं जातं आणि त्यानंतरच त्यांची दखल घेतली जाते. हे त्यांना देखील माहित आहे. त्यामुळे प्रत्येकाने एक गोष्ट जरूर लक्षात ठेवावी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नसता तर आपणास आमंत्रण देण्यासाठी कोणीही आलं नसतं. तसंही पक्ष सोडून जाणाऱ्या लोकांची व्यक्तिगत कारणे असतील देखील पण एखाद्या व्यक्तीच्या पक्ष सोडून जाण्याने पक्ष संपत नसतो. यातूनच नवी भरारी घेता येते. तसंही भाकरी बदलण्याचा विचार करताना भरडं पीठ आपोआप बाजूला गेलेलं कधीही चांगलंच असतं.’ असे ही म्हटलं आहे.