मुंबई – राज्यातील करोनाबाधितांची संख्या रविवारी 50 हजारांच्या पार गेली आहे. यात रविवारी दिवसभरात तब्बल 3,041 रुग्णांची भर पडली. यामुळे करोनाबाधितांची संख्या 50 हजार 231 इतकी झाली आहे. तर मुंबईत एका दिवसात 1 हजार 725 करोना रुग्णांची भर पडली आहे. मात्र मुंबईतील महत्त्वाच्या हॉटस्पॉटमध्ये रुग्णसंख्या वाढीचा दर मंदावला आहे.
मुंबईतील कमी रुग्णसंख्या असलेल्या अनेक विभागांमध्ये रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. मात्र, मुंबईतील महत्त्वाच्या हॉटस्पॉटमध्ये रुग्णसंख्या वाढीचा दर मंदावला आहे. मुंबईतील एन वॉर्ड म्हणजे घाटकोपर परिसरात रुग्णवाढीचा दर सर्वाधिक 13.7 टक्के इतका आहे.
विशेष म्हणजे मुंबईतील करोना हॉटस्पॉट असलेल्या वरळी म्हणजे जी दक्षिण विभागाचा रुग्णसंख्या वाढीचा दर सर्वात कमी आहे. जी दक्षिण विभागात रुग्णवाढीचा दर 3.4 टक्के आहे. तसेच रुग्णाचा डबलिंग रेटही 21 दिवसांवर गेला आहे. मुंबईतील 8 वॉर्डमध्ये रुग्णवाढीचा दर 8 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. मुंबईतील रुग्णसंख्या वाढीचा दर 16 ते 22 मे दरम्यान 6.61 टक्के इतका आहे.
मुंबईत प्रत्येक विभागात आठवडाभरातील रुग्णसंख्या एकत्र करून विभागाची सरासरी दैनंदिन रुग्णवाढ संख्या निश्चित केली जाते. प्रतिदिन रुग्णवाढीचा दर म्हणजे मागील दिवसाच्या तुलनेत त्या विभागात झालेल्या एकूण रुग्णवाढीची टक्केवारी असते.
औरंगाबादमध्ये नऊ तासांत पाच मृत्यू
मुंबई, पुणे पाठोपाठ औरंगाबादमध्येही करोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. त्याता आता करोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येतही भर पडत आहे. काल रात्रीपासून औरंगाबाद शहरातील चार व सिल्लोड येथील एक अशा पाच जणांचा नऊ तासांत करोनामुळे मृत्यू झाल्या आहे. यामुळे रेड झोनमध्ये समावेश असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.