नवी दिल्ली – नवीन संसद भवनाचे उद्घाटन २८ मे रोजी होणार आहे. अशा परिस्थितीत नवीन संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्याला अनेक राजकीय पक्ष आधीच विरोध करत आहेत. संसद भवनाचे उदघाटन राष्ट्रपतींच्या हस्ते व्हावं अशी मागणी देखील यापूर्वी विरोधकांनी केली होती. आता या उदघाटनावर काही विरोधी पक्ष बहिष्कार टाकणार आहेत. ज्यामध्ये राष्ट्रीय जनता दल आरजेडीचा समावेश आहे.
28 मे रोजी दिल्लीतील नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय आरजेडीने घेतला आहे.तसेच महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे गट देखील या उदघाटनावर बहिष्कार टाकणार असल्याचे समजते. संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनावर सर्व विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असून आम्ही देखील तेच करणार असल्याची माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली.
हे पक्ष टाकणार बहिष्कार
तृणमूल काँग्रेसने सर्वप्रथम या समारंभाला उपस्थित न राहण्याची घोषणा केली होती. यानंतर आम आदमी पक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाने मंगळवारी नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली. या तिन्ही पक्षांनी 28 मे रोजी नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार नसल्याचे जाहीर केले होते. याशिवाय काँग्रेससह अन्य विरोधी पक्षही उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याची शक्यता आहे.
नव्या संसद भवनाच्या उदघाटनाबाबत विरोधी पक्षातील नेत्यांकडून नाराजीचा स्वर पाहायला मिळाला. राष्ट्रपतींनी हे उदघाटन करायला हवं असा स्वर विरोधकांमध्ये सुरु झाल्याचे पाहायला मिळाले. अशात आता या बहिष्काराच्या संदर्भात विरोधकांकडून लवकरच संयुक्त निवेदन जारी केले जाऊ शकते.