मुंबई : नवीन संसद भवनाच्या निर्माणावरून आणि उदघाटनावावरून सध्या सरकारवर टीका करण्यात येत आहे. त्यातच आज शिवसेना (उद्धव ठाकरे ) खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. याविषयी बोलताना ‘नव्या संसद भवनाची काय गरज होती? आपली जुनी संसद आणखी १०० वर्षे टिकणार इतकी बळकट आहे. तरीही या सरकारने नवी संसद उभारली. तरीही राष्ट्रपतींना उद्घनापासून का डावललं आहे? नावाच्या पाट्या लावण्यासाठी नवी संसद उभारली आहे का?’ असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे.
माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी,’एका आदिवासी महिलेला राष्ट्रपती केलं असं वारंवार मोदी सांगत होते. मग राष्ट्रपती महिलेची आठवण संसदेचं उद्घाटन करताना का झाली नाही? २८ मे रोजी नव्या संसद भवनाचा जो सोहळा होणार आहे त्या सोहळ्यावर काँग्रेससह आमचा बहिष्कार आहे. एका आदिवासी राष्ट्रपती महिलेला डावललं आहे त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.
देशाची अर्थव्यवस्था कमकुवत असताना सेंट्रल व्हिस्टा का उभारलं गेलं आहे? आत्ता जे संसद भवन आहे जिथे आम्ही बसतो ती इमारत आणखी १०० वर्षे टिकणार आहे. तरीही नवी संसद उभारली गेली. कारण शिलान्यासाच्या आणि उद्घाटनाच्या पाट्या मोदी सरकारला तिथे लावायच्या होत्या. नवी संसद गरज नसताना उभारली आता तिथे राष्ट्रपतींना बोलवण्यात आलेलं नाही. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा तो अधिकार आहे. त्या तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुख आहेत, न्यायव्यवस्थेच्या प्रमुख आहेत. पंतप्रधान आणि राष्ट्रपती हे एकाच कार्यक्रमाला जाऊ शकतात. मात्र त्यांना या कार्यक्रमाला बोलवण्यात आलेले नाही, असे देखील राऊत यांनी यावेळी म्हटले आहे.
नवी इमारत तयार करुन काय साधलं? राष्ट्रपती या आदिवासी महिला आहेत. त्यांना निमंत्रण का नाही? नव्या संसदेचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते करणं हा राजकीय शिष्टाचार आहे. मात्र पंतप्रधान या संसद भवनाचं उद्घाटन करत आहेत, हा इव्हेंट केला जातो आहे. काँग्रेससह सगळ्या पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकतो आहोत.
रामनाथ कोविंद हे द्रौपदी मुर्मूंच्या आधी राष्ट्रपती होते त्यांना काय अधिकार दिले गेले? द्रौपदी मुर्मू आदिवासी महिला आहेत आम्ही त्यांना राष्ट्रपती केले असे छातीठोकपणे मोदी आणि भाजपाचे नेते सांगत होते. आता त्यांना नव्या संसदेच्या उद्घाटनाचा सन्मान का देत नाही? या दोघांची अवस्था रबर स्टँपसारखी करण्यात आली आहे. राष्ट्रपती भवनाच्या समोर नवं संसद भवन आहे. त्या कार्यक्रमाला राष्ट्रपतींना निमंत्रण नाही. ही नेमकी कुठली लोकशाही आहे? असाही प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे.