नवी दिल्ली -इंडिया या लक्षवेधी आणि प्रभावी नावाच्या छत्राखाली एकवटलेल्या देशभरातील विरोधी पक्षांनी मंगळवारी बैठकीनंतर सामूहिक संकल्प जारी केला. तो विरोधकांच्या अजेंड्याची झलक दाखवणारा आहे. सामूहिक संकल्पाच्या माध्यमातून विरोधकांनी एकप्रकारे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले आहे.
भाजपचा समर्थपणे मुकाबला करण्याचे उद्दिष्ट समोर ठेऊन विरोधक एकत्र आले आहेत. त्यामुळे साहजिकच भाजपला घेरण्यासाठी कुठली रणनीती वापरणार याचे सूतोवाच सामूहिक संकल्प या विरोधकांच्या ठरावाने केले आहे. आपल्या प्रजासत्ताकाच्या वैशिष्ट्यांवरच भाजपकडून हल्ला केला जात आहे. राज्यघटना, धर्मनिरपेक्ष लोकशाही, आर्थिक स्वायत्तता, सामाजिक न्याय, संघराज्यीय रचना आदींना क्षीण केले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर, भारताच्या संकल्पनेचे रक्षण करण्याचा आमचा निर्धार आहे, असे विरोधकांनी नमूद केले आहे. जातनिहाय जनगणनेची आग्रही मागणीही त्यांनी केली आहे.
भाजपकडून द्वेषाची विखारी मोहीम राबवली जाते. त्यातून हिंसाचाराला चिथावणी मिळते. द्वेष आणि हिंसाचाराला पराभूत करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. महिला, दलित, आदिवासी आणि काश्मिरी पंडितांच्या विरोधातील वाढते गुन्हे आम्हाला थांबवायचे आहेत, असे ठरावात अधोरेखित करण्यात आले आहे.
अर्थव्यवस्थेच्या मजबुतीसाठी आणि उद्योग, शेतकरी, शेतमजुरांच्या कल्याणासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही विरोधकांनी दिली आहे. वाढती महागाई, सर्वोच्च पातळीवर पोहचलेली बेरोजगारी आदी आर्थिक पेच सोडवण्यासाठी पाऊले उचलली जातील. देशापुढे आम्ही पर्यायी राजकीय, सामाजिक आणि आर्थिक कार्यक्रम सादर करू. देशाला सल्लामसलत, लोकशाही पद्धतीवर आधारलेले प्रशासन दिले जाईल, असेही ठरावात म्हटले आहे.