नगर -करोना महामारीच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर येत्या एक मे पासून सरकार केशरी कार्ड धारकांनाही स्वस्त धान्य पुरविणार आहे. तथापि, मागील पंधरा वर्षांत किमान साठ टक्के नागरीकांनी स्वस्त धान्यच घेतलेले नाही. त्यांना आपले रेशनदुकान कोणते व कोठे आहे? हेच प्रथम शोधावे लागणार आहे.
करोना महामारीच्या संकटात देश लॉकडाऊन असल्याने सर्वत्र व्यवहार ठप्प आहेत. कोणताच व्यवसाय सुरु नाही. त्यामुळे पिवळे रेशनकार्ड असलेल्यांप्रमाणेच आता केशरी रेशनकार्ड धारक असलेलेही प्रचंड अडचणीत आहेत. रोजगार बुडाल्याने त्यांच्याही पोटाचा प्रश्न आहेच. त्यामुळे सरकारने ही योजना जाहीर केली.तथापि, यातील बहुतांश लोकांनी मागील पंधरा वर्षात एकदाही शिधापत्रिकेवर धान्य नेलेले नाही. त्यातील 60 टक्के लोकांना आपली शिधापत्रिका संलग्न असलेले सरकारी स्वस्त धान्य दुकान कोणते आहे, आणि सध्या ते कुठे आहे, हेच सापडणार नाही, अशी स्थिती आहे.
त्यामुळे शोधाशोधीच्या या भानगडीत अनेकजण पडणारही नाहीत, अशीच स्थिती आहे. त्यामुळे बहुतांश लोक या दुकानांपर्यंत पोचणार नाहीत. परंतु त्यांच्या नावावरील धान्य उचलून ते काळ्या बाजारात विकले जाण्याची शक्यताच अधिक असेल.यावेळी बायोमेट्रिक नोंदी, काहीही न पाहता धान्य देण्याचे शासनाचे आदेश आहेत. त्यामुळे प्रत्येकाच्या नावाचे धान्य हे उचलले जाणार आहे. परंतु ते लाथार्थ्यांना मिळालेच का? याची खातरजमा करण्याची यंत्रणा फारशी सक्षम राहाणार नाही.
गैरकारभाराच्या तक्रारींची गरज…!
करोना संकटाच्या काळात जर आपणास रेशन कार्ड वरील धान्य मिळत नसल्यास अथवा रेशनच्या भावासंदर्भात काही तक्रार असल्यास शासनाच्या हेल्पलाइन नंबरवर त्याची तक्रार नोंदवता येईल. रेशन घेऊन जाताना तेथे काही आक्षेपार्ह असल्यास त्याचे मोबाइलमध्येच व्हिडिओ किंवा ऑडिओ रेकॉर्डिंग करूनही गैरकारभाराची पुराव्यासह तक्रार करता येईल. इथे नोंदवा तक्रार केशरी शिधापत्रिकाधारकांनी एक मे नंतर आपले स्वस्त धान्य दुकान शोधून तेथे आवर्जून जायला हवे. आपल्या नावाचे अगदी स्वस्तात मिळणारे धान्य विकत घ्यावेच आणि स्वतःला ते नको असेल, तर एखाद्या वंचित घटकाला किंवा खऱ्या गरजवंतांना ते वाटून द्यावे. ही मोहीम संकटकाळात गरिबांचा आधार ठरेल.
ऍड. श्याम आसावा , सामाजिक कार्यकर्ते, नगर.