डोर्लेवाडी – करोनाच्या संकटामुळे बारामती तालुक्यातील द्राक्ष पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसला हंगामातील जवळपास 250 टन द्राक्ष अद्यापही शिल्लक आहे. द्राक्षांचे भाव देखील कोसळले आहेत. जिल्हा बंदी असल्याने तालुक्यातील द्राक्ष बाहेर जाऊ शकले नाही तसेच द्राक्ष खरेदीसाठी बाहेरील व्यापाऱ्यांनी देखील पाठ फिरवली. त्यामुळे द्राक्ष बागायतदार शेतकरी अडचणीत सापडला.
करोनाच्या पार्श्वभूमीवर बारामती शहरात भिलवाडा पॅटर्न अवलंबण्यात आला त्यानुसार शहरातील नागरिकांना घरपोच भाजीपाला देण्याची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. मंडई शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा भाजीपाला शेतकरी बचत गटांच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना पुरवण्यात येत आहे. दिवसाला 15 ते 20 टन भाजीपाला विकला जात आहे. त्यामुळे भाजीपाला किंवा मंडई शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले नाही.
उसासह तालुक्यातील 20 हजार हेक्टर क्षेत्र खरिपाचे आहे कृषी विभागाच्या वतीने खरिपाच्या हंगामाचे तयारी करण्यात आली असल्याचे तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ यांनी सांगितले.