नवी दिल्ली – मोदी सरकारच्याविरोधात मांडण्यात आलेल्या अविश्वास ठरावावर संसदेमध्ये दिनांक 8 आणि 9 ऑगस्ट रोजी चर्चा होणे अपेक्षित आहे. या ठरावावर 10 ऑगस्ट रोजी मतदान घेतले जाऊ शकते, असे सूत्रांनी म्हटले आहे.
भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारविरोधात विरोधकांच्या “इंडीया’ आघाडीच्यावतीने हा अविश्वास ठराव आणला गेला आहे. मणिपूरमध्ये झालेला हिंसाचार आणि महिलांवरील अत्याचाराच्या मुद्यावर संसदेत सविस्तर चर्चा घ्यावी अशी जोरदार मागणी विरोधकांकडून करण्यात येत होती.
पंतप्रधानांनी निवेदन करावे, अशी मागणी करूनही पंतप्रधानांनी या विषयावर मौन बाळगल्यामुळे कॉंग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांनी 26 जुलै रोजी सरकारविरोधात अविश्वास ठरावाची नोटीस सभापतींकडे दिली होती. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी विरोधकांचा या ठरावाचा प्रस्ताव गेल्या आठवड्यात दाखल करून घेतला आहे.
या ठरावावरील चर्चा आणि मतदानाची तारीख नंतर जाहीर केली जाईल, असे सभापतींनी म्हटले होते. या अविश्वास ठरावाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देण्याची शक्यता आहे. अविश्वास ठरावासह सर्व मुद्यांवर चर्चा करण्यासाठी सरकार तयार आहे, असे सरकारच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.