कोलकाता – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील जनतेला संबोधित करताना पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना नोव्हेंबर अखेरपर्यंत वाढवत असल्याची घोषणा केली. पंतप्रधानांच्या या घोषणेनंतर अवघ्या काही तासांमध्येच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एक मोठी घोषणा केली असून यानुसार पश्चिम बंगाल सरकार केंद्राची ही योजना जून २०२१ अखेरपर्यंत राबवणार आहे.
तत्पूर्वी आज देशातील जनतेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, ‘भारतातील ८० कोटीहून अधिक लोकांना पंतप्रधान गरीब अन्न कल्याण योजनेअंतर्गत तीन महिन्यांचे रेशन देण्यात आले होते, म्हणजेच कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी पाच किलो गहू किंवा तांदूळ मोफत देण्यात आले. ही योजना नोव्हेंबर महिन्यापर्यंत वाढविण्यात आली आहे.’ अशी माहिती दिली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेनुसार पुढील पाच महिन्यांसाठी प्रतिव्यक्ती पाच किलो गहू अथवा तांदूळ व एक किलो हरभरा डाळ देण्यात येणार आहे.
दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीबाबत माहिती देताना सरकार गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार राज्यात अनलॉक – २ ची प्रक्रिया राबवणार असल्याचे सांगितले.
यावेळी बोलताना त्यांनी, राज्यात सकाळी ५.३० ते ८.३० पर्यंत मॉर्निंग वॉक, लग्नविधीसाठी ५० जणांना उपस्थित राहण्याची परवानगी अशा मुभा देण्यात येतील असेही सांगितले.
पश्चिम बंगालमध्ये काल (सोमवारी) सर्वाधिक ६२४ कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून राज्यामध्ये आतापर्यंत १७,९०७ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या ६५३ एवढी आहे.