चंदीगड: पूर्व लडाखमध्ये चीनशी झालेल्या युद्धाच्या घटनेवरून कॉंग्रेसचे नेते आणि पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे. ‘आम्ही १९४८, १९६५, १९७१, १९९९ ची लढाई जिंकली आहे. आता तुमची वेळ आहे, असे आव्हान त्यांनी मोदींना दिलं आहे.
मुख्यमंत्री सिंह पत्रकार परिषदेत म्हणाले, ‘६० च्या दशकापासून चीनशी आपला संघर्ष आहे. गलवान ही पहिलीच घटना नाही. मला खात्री आहे की भारत सरकार सीमेवर सैन्य मजबूत करत आहे.
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सोमवारी केंद्रातील भाजपा प्रणित एनडीए सरकारला भारत आणि चीनमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर चिनी कंपन्यांकडून पंतप्रधानांच्या पीएम केअर फंडामध्ये मिळालेली देणगी परत करण्यास सांगितले.
‘मला वाटते चीनच्या विरोधात आपण कठोर भूमिका घेतली पाहिजे. मला वाटत नाही की जेव्हा आपले सैनिक शहीद होतात. तेव्हा आम्ही चिनी कंपन्याकडून पैसे घेऊ शकतो, असे कॅप्टन म्हणाले. १५-१६ जूनच्या मध्यरात्री लडाखमध्ये, चिनी सैनिकांसोबत झालेल्या चकमकीत २० भारतीय सैनिक ठार झाले होते.
पीएम केअर फंडमध्ये दान केलेल्या काही चिनी कंपन्यांची नावेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी घेतली. ते म्हणाले, ‘किती पैसे आले, हा प्रश्न नाही. जेव्हा ते चीन कोविड आणि आपल्या देशाविरुद्ध षडयंत्र करण्यास जबाबदार आहे तर आपण चिनी कंपन्यांकडून एक रुपयादेखील घेऊ शकत नाही. स्वतःची काळजी घेण्यासाठी भारताला चीनच्या पैशांची गरज नाही’.