भारतातील सर्वात प्रगत आणि राजकीयदृष्ट्या प्रगल्भ राज्य मानण्यात येणाऱ्या महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या तीन-चार महिन्यांपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्याचा पुढचा अंक आता सुरू झाला आहे. या अंकाचा सूत्रधार निवडणूक आयोग ठरला आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील शिवसेनेच्या मालकी हक्काबाबत जो वाद सुरू होता त्याबाबत आपला तात्पुरता निर्णय देताना शिवसेनेवर मालकीचा दावा करणाऱ्या कोणालाच “शिवसेना’ हे नाव वापरता येणार नाही, असे सांगताना शिवसेनेचे लोकप्रिय निवडणूक चिन्ह असलेले धनुष्यबाणही गोठवून टाकले आहे. साहजिकच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेतून बाहेर पडून मुख्यमंत्रिपदावर विराजमान झालेले एकनाथ शिंदे या दोघांसाठीसुद्धा आगामी कालावधी हा अस्तित्व दाखवण्याची लढाई असणार आहे. या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आता उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट यांना आपल्या गटाचे नाव ठरवावे लागणार आहे.
आपल्या गटासाठी कोणते निवडणूक चिन्ह घ्यायचे याचाही निर्णय घ्यावा लागणार आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये जेव्हा जेव्हा माध्यमांनी उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा उल्लेख “ठाकरे गट’ किंवा “शिंदे गट’ असा केला तेव्हा दोघांनीही त्याला आक्षेप घेऊन आमचीच शिवसेना खरी असल्याचा दावा केला होता. आता मात्र निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे दोघांनाही “शिवसेना’ हे नाव वापरता येणार नाहीच शिवाय धनुष्यबाण या चिन्हाचाही वापर करता येणार नाही. म्हणजेच दोघांचीही ओळख गट अशीच राहणार आहे. धनुष्यबाण ही शिवसेनेची खरी ओळख असल्याने एक प्रकारे हा उद्धव ठाकरे गटाला धक्का असला तरी एकनाथ शिंदे यांच्यासाठीसुद्धा हा दिलासा आहे, असे म्हणता येणार नाही. कारण कोणत्याच गटाला धनुष्यबाण आणि शिवसेना या शब्दांचा वापर करता येणार नाही. म्हणूनच या दोन्ही गटांसाठी आगामी कालावधी हा अस्तित्वाची लढाई सिद्ध करणारा काळ असणार आहे.
आज सोमवारपर्यंत या दोन्ही गटांना आपल्या गटाचे नाव आणि अपेक्षित निवडणूक चिन्ह निवडणूक आयोगासमोर सादर करावयाचे आहे, तसे ते ठाकरे गटाने आणि शिंदे गटानेही केले आहे. अर्थात, हा विषय फक्त अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी असला तरी लवकरच होणाऱ्या महापालिका निवडणुकीपर्यंत निवडणूक आयोगाने जर निर्णय घेतला नाही तर हेच नाव आणि हे चिन्ह तेव्हासुद्धा कायम राहू शकते. शिवसेना जेव्हापासून निवडणुकीच्या सक्रिय राजकारणात उतरली आहे तेव्हापासून धनुष्यबाण हीच या पक्षाची ओळख आहे. अर्थात शिवसेनेच्या प्रारंभीच्या काळामध्ये शिवसेनेचे निवडणूक चिन्ह वेगळे होते. नंतर त्यात बदल करून धनुष्यबाण हे चिन्ह कायमस्वरूपी घेण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे निर्माते आणि नेते राज ठाकरे यांनी अतिशय चतुराईने शिवसेनेचे अगोदरचे निवडणूक चिन्ह असलेले रेल्वे इंजिन आपल्या पक्षाचे चिन्ह म्हणून घेतले आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे आपल्या गटासाठी कोणते निवडणूक चिन्ह घेतात आणि एकनाथ शिंदे यांच्याकडून कोणता निर्णय घेतला जातो, हे पाहणे निश्चितच औत्सुक्याचे ठरणार आहे. अर्थात, आधुनिक काळामध्ये निवडणुकीतील एक उपचार म्हणून निवडणूक चिन्हांचा वापर केला जातो, ही गोष्ट विसरून चालणार नाही.
जेव्हा भारतात साक्षरता खूप कमी होती तेव्हा बहुसंख्य निरक्षर जनता मतदान करत असताना त्यांना उमेदवारांचे नाव वाचता येत नसे म्हणून या निवडणूक चिन्हांचा पर्याय देण्यात येत होता. आधुनिक काळामध्ये माध्यमांचे विविध पर्याय उपलब्ध असल्याने आणि साक्षरता मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने उमेदवाराचे नाव वाचूनच मतदान केले जात आहे आणि सर्व थरातील प्रचाराच्या निमित्ताने उमेदवाराचे नावही मतदारांच्या मनावर बिंबवले जात आहे. साहजिकच फक्त निवडणुकीतील यश मिळवण्यासाठी निवडणूक चिन्ह किंवा पक्षाचे नाव ही सध्या गौण बाब असली, तरी गटाचे अस्तित्व दाखवण्यासाठी ही महत्त्वाची बाब ठरणार आहे.
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये काय निकाल लागतो हेसुद्धा महत्त्वाचे असले, तरी शिवसेनेच्या आमदाराच्या निधनानंतर या ठिकाणी पोटनिवडणूक होत असल्याने अशा प्रकारच्या निवडणुका नेहमीच सहानुभूतीच्या लाटेवर लढल्या जातात; पण याठिकाणी एकनाथ शिंदे आपल्या गटाच्या कोणाला संधी देतात आणि निवडणूक जिंकून आणण्यासाठी किती प्रयत्न करतात हे पाहणेसुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे. उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट या दोनही गटांच्या अस्तित्वाची पहिली चाचणी म्हणूनच या अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीकडे पाहावे लागणार आहे. अर्थात पक्षाचे नाव वापरता येणार नाही किंवा निवडणूक चिन्ह वापरता येणार नाही म्हणून पक्ष संघटना संपली किंवा कमकुवत झाली, असे उद्धव ठाकरे यांनीही मानू नये. नव्या उमेदीने आणि कणखर मानसिकतेने निवडणुकीला सामोरे जायला हवे. उद्धव ठाकरे आणि त्यांचे सर्व सहकारी एकनाथ शिंदे गटाचा उल्लेख नेहमीच गद्दार आणि खोकेवाले असे करत आहेत.
आदित्य ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर खोकेवाल्यांनी शिवसेनेचे नाव संपवले, अशा आशयाचे ट्विट केले आहे. साहजिकच आगामी कालावधीमध्ये याच एका मुद्द्यावर निवडणुकीत प्रचार करून एकनाथ शिंदे गटाबाबत नकारात्मक वातावरण तयार केले जाऊ शकते. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आमदार आणि खासदार यांनी केवळ बंडखोरी केली नाही, तर शिवसेनेचे नाव संपवण्याचे आणि निवडणूक चिन्ह संपवण्याचेही काम केले, अशा प्रकारचा प्रचार ठाकरे गटाने केला, तर आश्चर्य वाटायला नको. या प्रचाराला योग्य उत्तर देण्याचे काम एकनाथ शिंदे गटाला करावे लागणार आहे.
एक गोष्ट याठिकाणी विसरता येणार नाही ती म्हणजे निवडणूक आयोगाने दिलेला हा निर्णय फक्त अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी लागू आहे. नजीकच्या कालावधीमध्ये दोन्ही गटांनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे निवडणूक आयोग आपला अंतिम निर्णय देऊ शकते जो आगामी कालावधीत होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी लागू ठरू शकतो. सध्यातरी ठाकरे गट आणि शिंदे गट यांना अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी आपले राजकीय अस्तित्व सिद्ध करावे लागणार आहे. निवडणूक आयोगाच्या अंतिम निर्णयानंतर दोन्ही गटांच्या अस्तित्वाशी खरी आणि अंतिम लढाई सुरू होणार आहे.