पुणे -नवीन शैक्षणिक धोरण मानवाला परिपूर्ण करणारे असून जगातील सर्व विद्यापीठाशी करार करण्याचे कार्य सुरू आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून महाविद्यालयांना नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात येईल. चार वर्षांची पदवी व अभ्यासक्रम सुरू करण्यात येईल. या बदलामुळे प्राध्यापकांच्या नोकरीवर गदा येणार नाही, असे आश्वासन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, भारत आणि संतश्री ज्ञानेश्वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या वतीने युनेस्को अध्यासनाअंतर्गत आयोजित 27 वी तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेत “राष्ट्रीय शिक्षण धोरण’ या विषयावर आयोजित दुसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते.
यावेळी प्रा. डॉ. मोहन केशव फडके हे सन्माननीय पाहुणे होते. अध्यक्षस्थानी विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासनाचे प्रमुख प्रा. डॉ. विश्वनाथ कराड होते. यावेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्यकारी अध्यक्ष राहुल कराड, कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस, डॉ. प्रसाद खांडेकर व प्रा. दत्ता दंडगे उपस्थित होते. यावेळी प्रा. डॉ. मोहन केशव फडके लिखित “वैदिक मंत्रा फॉर द डिसिज फ्री लाइफ’ इंग्रजी व मराठी पुस्तकाचे प्रकाशन हस्ते करण्यात आले. शिक्षणाच्या माध्यमातूनच मानव व जगाला दिशा दाखविता येईल.
ज्ञानेश्वरांचे सर्व सिद्धांत मानव जातीच्या कल्याणासाठी आहे. जगाला नवी दिशा देण्यासाठी नवीन शिक्षण पद्धत गरजेची आहे, असे प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांनी स्पष्ट केले आहे.
नवीन पद्धती घोकंपट्टीची नाही
नवीन शिक्षण पद्धत घोकमपट्टीची नसून मानवाला परिपूर्ण करणारी असेल. जून 2030 मध्ये सर्वांना ही अनिवार्य असेल. नवीन धोरणामुळे प्राध्यापकांमध्ये भीती आहे. पण त्यांना घाबरण्याची गरज नाही. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा वर्कलोड वाढणार नाही किंवा कमीपण होणार नाही. प्राध्यापकांची भरती ही मोठ्या प्रमाणात होणार आहे. राज्यात नव्या ऑर्टस, कॉमर्स आणि सायन्स कॉलेजला परवानगी दिली जाणार नाही, असे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.