पुणे: अभियांत्रिकी, फार्मसी आणि कृषी पदवी प्रथम वर्ष प्रवेशासाठी अनिवार्य असलेली “एमएचटी-सीईटी’ या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना जिल्हा बदलण्याची संधी 10 जूनपर्यंत देण्यात आली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर ही संधी देण्यात आल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी जवळचे परीक्षा केंद्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
एमएचटी-सीईटी ही परीक्षा देण्यासाठी अनेक विद्यार्थी जिल्हा बदलून दुसऱ्या जिल्ह्यात जाणार होते. दरम्यान, या संसर्गजन्य रोगामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. परंतु आता करोना या संसर्गजन्य रोगाच्या तसेच निसर्ग या वादळाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना जिल्ह्याची प्राथमिकता बदलण्याची संधी मिळाली आहे. ” दि.10 जूनपर्यंत या परीक्षेचे अर्ज भरलेले उमेदवार जिल्हा प्राथमिकता बदल करू शकतात,’ अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ट्विट करत दिली आहे.
पालक तसेच विद्यार्थ्यांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचे उदय सामंत यांनी म्हटले आहे. 10 जूनच्या रात्री बारा वाजेपर्यंत विद्यार्थी आपला जिल्हा बदलू शकतात. या निर्णयाने विद्यार्थ्यांसह पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ज्यांना जिल्हाबदल करायची गरज होती, त्यांच्यासाठी ही संधी महत्त्वाची ठरणार आहे. याबाबतचे परिपत्रक राज्य सीईटी सेलनेही प्रसिद्ध केले आहे.