मुंबई – “जे गेलेत त्यांच्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस गटाचे दरवाजे बंद झाले आहेत’, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. अजित पवारांसोबत सत्तेत गेलेल्या आमदार, पदाधिकाऱ्यांबाबत बोलतांना शरद पवारांनी हे वक्तव्य केले. तसेच, पवारांनी यावेळी केंद्र सरकारवर देखील निशाणा साधला आहे.
येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादीचे सर्व आमदार, खासदार आणि जिल्हाध्यक्षांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत त्यांनी महाविकास आघाडीमध्ये ज्या काही आपल्या वाटेला 70-80 येतील त्याच्या तयारीला लागण्याचे आवाहन देखील यावेळी कार्यकर्त्यांना केले.
“देशाचे नाव बदलण्याचा इतका अट्टाहास केंद्र सरकारला का आहे? बदलायचे असेल तर मग आता गेटवे ऑफ इंडिया आणि रिझर्व्ह बॅंकेचे देखील नाव बदला,’ असे म्हणत पवारांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.
जी -20 सारख्या परिषदा यापूर्वी दोनदा आपल्या देशात झाल्या. एकदा इंदिरा गांधी या पंतप्रधान असतानाही ती झाली होती. पण त्यावेळी आज ज्या पद्धतीचं वातावरण होते, तसे नव्हते. त्यावेळी देखील जगातले लोक भारतात आले होते.
जगातले राष्ट्रपती आपल्या देशात येतात त्यांचा सन्मान करणे आपले कर्तव्य आहे. पण यामुळे मूलभूत प्रश्न सोडून काही ठराविक लोकांचा मोठेपणा दाखवण्यात आला आणि याची चर्चा आज ना उद्या त्या देशांत नक्की होईल, असेही शरद पवार म्हणाले.
हे तर तुमचे माझे कर्तव्यच
देशाच्या पातळीवर अनेक महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित आहेत आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यांना बाजूला सारुन आपल्याला हवे तसे वातावरण निर्माण करण्यात आले.
यामुळे आगामी लोकसभेच्या निवडणुकांच्या दिशेने त्यांनी एक पाऊल पुढे टाकले आहे. परंतू, महागाईचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, जनतेचे प्रश्न या कोणत्याच प्रश्नाकडे आताचे राज्यकर्ते लक्ष देत नाहीत.
त्यामुळे ही गोष्ट त्यांच्या लक्षात आणून देणे हे तुमचे आणि माझे कर्तव्य आहे. हा प्रयत्न आपण करतच राहू. तसेच, देशातील जनतेचे लक्ष विचलित करण्याचा केंद्र सरकारकडून प्रयत्न होत असल्याचा आरोपही पवारांनी यावेळी केला आहे.