वडगावशेरी -“पाणी जपून वापरा’ अशा सूचना नागरीकांना करणाऱ्या महापालिका प्रशासनाचा “सरकारी’ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. वडगावशेरी येथील मुख्य जलवाहिनी सात ते आठ महिन्यांपूर्वी फुटलेली असताना दुरस्तीकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने यातून दररोज हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे.
वडगावशेरी परिसरातील बीडी कामगार वसाहत आणि अन्य भागाला पाणी पुरवठा करण्यासाठी सुंदरबाई मराठे विद्यालया शेजारून मुख्य जलवाहिनी टाकण्यात आली आहे. सात ते आठ महिन्यापूर्वी तडा गेल्याने जलवाहिनीफुटली आहे.
पाणीपुरवठा सुरू केल्यानतर तो बंद करे पर्यंत दररोज हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाहून जात आहे. मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे याचा परिणाम या परिसराला कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे.
याबाबत नागरिकांनी माजी नगरसेविका उषा कळमकर यांच्याकडे समस्या मांडल्यानंतर कळमकर यांनी जलवाहिनी फुटल्याचे पाणी पुरवठा विभागास कळविले होते. परंतु, याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने हजारो लिटर पाणी वाया जात आहे.
भामाआसखेड योजनेमुळे या परिसराला मुबलक पाणी पुरवठा होईल, अशी नागरिकांची अपेक्षा होती. परंतु, पूर्वी होत होता तेवढ्या प्रमाणातही पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
पाणी गळतीची ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. मात्र, प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने पाण्याची नासाडी होत आहे. दुरूस्तीचे काम प्रशासनाने तात्काळ करावी. अन्यथा “मनसे स्टाइल’ने आंदोलन केले जाईल.
– सोहित बनकर, उपाध्यक्ष, मनविसे, पुणे शहर
गेल्या सात-आठ महिन्यांपासून जलवाहिनीतून पाणी वाहून चालले आहे. याबाबत कळवूनही प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. येत्या आठ दिवसात जलवाहिनी दुरूस्त झाली नाही तर जनआंदोलन करण्यात येईल.
– उषा कळमकर, माजी नगरसेविका
मुख्य जलवाहिनी फुटलेल्या ठिकाणी पाहणी करून वाहिनी दुरूस्ती करण्याचे काम तातडीने करण्याच्या सूचना केल्या जातील. असा प्रकार यापुढे हाणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत.
– नीलम गायकवाड, कनिष्ठ अंभियंता, पाणीपुरवठा विभाग