गावकी-भावकीचा ऋणानुबंध संपत चालला
पेठ – ग्रामीण भागात असलेली एकत्र कुटुंब पध्दती आता आधुनिक जमान्यात नामशेष होताना दिसत आहे, त्यामुळे भावकीचा विचार संपला असून ग्रामीण भागात पूर्वी जे लग्नसोहळे चार ते पाच दिवस चालायचे ते आता एकाच दिवसात मोठ्या शहरातल्या एखाद्या मंगल कार्यालयात होत असून, लग्नसोहळ्यांस इव्हेंटचे स्वरूप प्रात्प झाले आहे.
माझ्या घरासमोरच्या अंगणातच मंडप टाकणार, अंगण पुरले नाहीतर संपूर्ण शेतात मंडप टाकणार; पण लग्न माझ्या घरासमोरच वा शेतातच होणार,’ हा जुन्याजाणत्या मंडळींचा तोरा आता संपुष्टात आला आहे. कारण घराघरांतील भावकीमधील एकी कमी झाल्याने घरात होणारे लग्न आता मंगल कार्यालयात होऊ लागली आहेत. “पैसे द्या अन् लग्न पाहा’ अशा संस्कृतीची सुरुवात सध्या ग्रामीण भागात होऊ लागली आहे.
पूर्वी लग्न समारंभात भावकी पाहुण्यांना जेवायला वाढण्यापासून तर त्यांच्या स्वागताची, त्यांच्या पाहुणचाराची सारी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत होती. सध्याच्या आधुनिक जमान्यात भावकीतील कलह हा दिवसेंदिवस वाढतच आहे. घरातील मोठा भाऊ लग्नात पाहुण्यासारखा वागू लागला आहेण गावातील लोकांनी सहकार्य करणे बंद केले. घरातील वयोवृध्द मंडळींचा दाब कमी पडू लागला. या सर्वांचा परिणाम म्हणजे पाहुण्यांमध्ये अपमान नको म्हणून ग्रामीण भागातील लग्नाची पध्दतच पार बदलत चालली आहे.
मोठ्या शहरांतील एखादी मंगल कार्यालय घ्यायचे आणि दिवसभरांत सर्व मंगलविधी उरकायचे आणि गावाकडे वऱ्हाड घेऊन परतायचे… अशीच प्रथा आता रूढ होऊ लागली आहे. मंगल कार्यालयांत अगदी स्वागतासाठी देखील माणसे पैसे देवून भाड्याने मिळू लागली. हवे तेवढे पैसे मोजून घरातील मुलींचे-मुलांचे लग्न मोठ्या थाटात करण्याच्या उद्देशाने गरीब माणूस आणखीनच कर्जाच्या ओझ्याखाली जावू लागला आहे.
ऋण काढून सण साजरा करण्याच्या प्रकारांत ग्रामीण भागात वाढ होऊ लागली. मंगल कार्यांलयांतील भाडे, हुंडा, मानपान, मिरवणूक, लग्नबस्ता, सोने इत्यादींबाबत बाजारीकरण झाल्यामुळे ग्रामीण भागातील ही पाच-सहा दिवस चालणारी लग्नपध्दतच पूर्णपणे बदलत चालल्याने जुन्या जाणत्या वयोवृध्द मंडळींमध्ये खंत व्यक्त केली जात आहे.
इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांचे व्यवस्थापन
सध्याच्या काळात लग्नपध्दतीचे स्वरूपच पुर्णपणे बदलून गेले आहे. लग्न म्हणजे दोन घराण्यांचा एक आनंद सोहळा असतो. मात्र आता या आनंदी सोहळ्याला इव्हेंटचे स्वरूप प्राप्त झाले आहे. अनेक इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या या लग्नसोहळचे व्यवस्थापन करतात. लग्नसोहळा हा एक इव्हेंट वाटला पाहिजे इतकेच नाही तर तो प्रतिष्ठेचाही झाला पाहिजे यासाठी वर-वधूकडील मंडळी लागेल तेवढा पैसे खर्च करीत आहेत, त्यामुळे पैशाच्या खेळावर बदलत चालेले हे लग्नपध्दतीचे स्वरूप ग्रामीण भागांतील मध्यमवर्गासाठी धोकादायक ठरत आहे.
गर्दी होण्यासाठी सेलिब्रेटींनाही आमंत्रण
लग्न जर संधकाळी असेल तर दुपारच वेळेत आलेल पाहुणंचे मनोरंजन होण्यासाठी गाण्यांचा (ऑर्केस्ट्रा) कार्यक्रम ठेवला जातो. कार्यक्रमाध्ये पाहुण्यांचे मनोरंजन केले जाते. लग्नाला गर्दी दिसावी यासाठी सेलिब्रेटींना आमंत्रित केले जाते आणि अनेक लोक आपल्या आवडत्या सेलिब्रेटीला पाहण्यासाठी गर्दी करतात व लग्नाला खूप मोठा जमाव जमला आहे असे दाखविले जाते.
लाडू-चिवड्याची जागा विविध पदार्थांनी घेतली
लग्नसोहळा म्हटले की बुंदीचा लाडू आणि पोह्याचा चिवडा हे एक समीकरण आहे. मात्र, अलीकडच्या काळात या लाडू-चिवड्याची जागा वेगवेगळ्या पारंपरिक आणि वेस्टर्न पदार्थांनी घेतली आहे. याबरोबरच पंक्ती वाढणे किंवा किती पंक्ती जेवल्या यापेक्षा किती पदार्थांचे स्टॉल होते, यावर सर्वांच्या नजरा खिळू लागल्या आहेत.