राज्यस्तरीय संशोधनाचा निष्कर्ष : अंधशाळेतील दोन हजार मुलांची तपासणी
पुणे : प्रगत देशातील लोकांच्या मेंदूला प्राणवायूच्या कमतरतेने येणारे अंधत्वाचे प्रमाण जास्त आहे. राज्यातील अंधशाळेतील दोन हजार मुलांची तपासणी केली असता, त्यामध्ये अंधत्वाचे सर्वांत मोठे कारण हे जन्मत: अविकसित डोळा हे असल्याचे दिसून आले. त्यानंतर बुबुळाचे आजार, मागच्या पडद्याचे आजार आणि मोतीबिंदू अशी कारणे असल्याचे मत नेत्र तज्ज्ञांनी व्यक्त केले.
2019 मध्ये राज्यातील सर्व अंधशाळांच्या केलेल्या अभ्यासानुसार लहान मुलांच्या अंधत्वाच्या कारणात आपल्या समाजाच्या आर्थिक स्तरात होणाऱ्या बदलानुसार बदल होत आहे. हे संशोधन एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या समितीने केले आहे.
याबाबत डॉ. सुचेता कुलकर्णी म्हणाल्या, “अ’ जीवनसत्त्वाच्या अभावाने होणाऱ्या अंधत्वाचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच वेळेपूर्व जन्मलेल्या अर्भकामध्ये होणाऱ्या (रेटिनोपॅथी ऑफप्रिमॅच्युरिटी) या आजाराने होणाऱ्या अंधत्वाचे प्रमाण वाढले आहे.
याचा अर्थ सरकारने गरोदर महिलांना “अ’ जीवनसत्त्व देण्याच्या योजनेला यश मिळाले आहे. परंतू, सरकारने आता रेटिनोपॅथी ऑफ प्रिमच्युरिटी (आरओपी) ने येणारे अंधत्व टाळण्यासाठी उपाय करणे आवश्यक आहे.
त्यासाठी मोतीबिंदू आणि आरओपीया आजाराचे निदान व उपचार करण्यासाठी जास्तीत जास्त तज्ज्ञ डॉक्टर प्रशिक्षित करणे आणि संबंधित उपकरणे गरजेची आहेत. यातील 15% मुले पूर्णपणे अंध नव्हती. त्यांना विशिष्ट चष्मे देऊन त्यांची नजर सुधारता आली, असेही डॉ. कुलकर्णी म्हणाल्या.