पुणे-नगर महामार्गावर हातात बंदूक, काठ्या घेत शिस्तीचे घडवले दर्शन
शिक्रापूर- कोरेगाव भीमा (ता. शिरूर) परिसरात दि. 1 जानेवारी 2019 रोजीचा विजय रणस्तंभ मानवंदन कार्यक्रम शांतते पार पाडण्यासाठी व परिसरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सर्वस्तरांतून प्रयत्न सुरू आहे. तर रविवारी (दि. 29) पुणे-नगर महामार्गावरून दीड हजार पोलिसांनी संपुर्ण गावातून शांततेसाठी संचलन करण्यात आले आहे.
कोरेगाव भीमा येथे 2018 रोजी विजय रणस्तंभ मानवंद कार्यक्रमाप्रसंगी झालेल्या दंगलीचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले होते. याच पार्श्वभूमीवर 2019 प्रमाणेच यंदा 1 जानेवारी 2020च्या मानवंदन कार्यक्रमासाठी प्रशासनाने कमालीची सतर्कता बाळगली आहे.
कोरेगाव भीमामध्येच दीड हजारांपेक्षा अधिक पोलीस फौजफाटा, वरून व वज्र वाहने, अग्निशमन बंब तसेच इतर सामुग्रीसह राज्य राखीव दलाच्या 8 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. कोरेगाव भीमा परिसरातील गावांमधून सामाजिक सलोखा जपण्यासाठी गावातील प्रत्येक चौकात, वस्तीवर एक पोलीस अधिकारी व 10 कर्मचारी तैनात करण्यात आहेत.
कोरेगाव भीमा, पेरणे व वढु बुद्रुक याठिकाणी शनिवार (दि. 28) पासुनच जादाचा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. तर या पोलिसांचे गावोगावांत संचलन सुरू केले आहे. पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या सूचनेप्रमाणे घेण्यात आलेल्या या संचलनामध्ये बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक जयंत मीना, उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या शर्मा, आँचल दलाल, निरीक्षक सदाशिव शेलार, जनार्दन इंगोले, सहायक निरीक्षक नवनाथ रानगट, शिक्रापूरचे सहायक उपनिरिक्षक अविनाश थोरात, देविदास यांसह 20 निरीक्षक, 40 उपनिरिक्षक, 415 जिल्हा पोलीस, होमगार्ड व राज्य राखीव पोलीस दलाच्या आठ तुकड्यांमधील अधिकारी व जवान सहभागी झाले होते.
“कार्यक्रम अतिशय शांततेत पार पडणार’
एक जानेवारी कार्यक्रमाची सर्व तयारी पूर्णपणे झालेली असून पोलीस प्रशासनाचे सर्व घडामोडींवर बारकाईने लक्ष आहे. होणारा कार्यक्रम अतिशय शांततेत पार पडणार असल्याचा विश्वास अपर पोलीस अधीक्षक जयंत मीना व उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या शर्मा यांनी व्यक्त केला आहे.