Madhya Pradesh – मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh Election) आमदार नारायण त्रिपाठी यांनी ऐन निवडणुकीच्या काळात भाजपला रामराम ठोकला. एवढेच नव्हे तर, त्यांनी नवा पक्षही स्थापन केला. त्यामुळे सत्तारूढ भाजपपुढील आव्हानांत भर पडल्याचे मानले जात आहे.
मध्यप्रदेशच्या विंध्य विभागात प्रभाव असणारे ब्राह्मण नेते म्हणून त्रिपाठी यांच्याकडे पाहिले जाते. त्यांनी विंध्य जनता पक्षाची (विंजप) स्थापना केली आहे. त्यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले.
भाजपकडून दुटप्पी धोरणाचा अवलंब केला जातो. त्या पक्षाच्या उक्तीत आणि कृतीत फरक आहे. भाजपला दुबळे बनवून प्रामुख्याने विंध्य विभागात पराभूत करणे हे माझे लक्ष्य आहे. विंजप कुठल्याही पक्षाची बी-टीम म्हणून काम करणार नाही.
स्वतंत्र विंध्य राज्याच्या निर्मितीची मागणी पुढे करून आमचा पक्ष विधानसभा निवडणूक लढवेल, असे त्यांनी म्हटले. त्रिपाठी चार वेळा विधानसभेवर निवडून गेले.
भाजपच्या तिकिटावर दोनवेळा, तर कॉंग्रेस आणि समाजवादी पक्षाचे उमेदवार म्हणून प्रत्येकी एकदा ते आमदार बनले. आता स्वतंत्र पक्ष स्थापण्याचे त्यांचे पाऊल भाजपसाठी मोठा राजकीय हादरा ठरले आहे.
उत्तरप्रदेशच्या सीमेलगत असणाऱ्या विंध्य विभागात विधानसभेच्या 30 जागा आहेत. त्यातील 24 जागा भाजपने मागील निवडणुकीत पटकावल्या होत्या.