मुंबई – राज्यात अवकाळी पावसामुळे हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, गारपीट आणि वादळी पावसाचा पुन्हा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. उत्तरअंतर्गत कर्नाटकपासून दक्षिण तमिळनाडूपर्यंत समुद्र सपाटीपासून 900 मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून, खंडित वारे वाहत आहेत.
दिवसभर उन्हाचा तडाखा आणि संध्याकाळी अचानक गारपीट आणि वादळी पाऊस होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्यात पुन्हा गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
काही भागांत पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
राज्यात पुढच्या 24 तासांत उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्याच्या कमाल तापमानात 2 ते 3 अंशांची वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकणातील पालघरमध्ये वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, नाशिक, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे.