कोपरगाव – कोपरगाव मतदारसंघातील नागरीकांच्या सेवेसाठी कोल्हे परिवार राजकारण विरहीत बारा महिने, चोवीस तास जनसेवा करीत आहे. तालुक्यासह शहरातील महापुराचे संकट असो किंवा रोगराई, दुष्काळ, ऊन, वारा, पाऊस, असे नैसर्गिक संकटासह वैयक्तिक संकटात कोल्हे परिवार रात्री बेरात्री जनतेच्या सेवेसाठी धाऊन जाते. त्यामुळे जनतेला कोल्हे परिवाराचे कष्ट माहित असल्याचे प्रतिपादन संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी केले.
छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून आ. स्नेहलता कोल्हे यांना पाठींबा दर्शवला आहे. यावेळी कोल्हे बोलत होते. यावेळी सुमित कोल्हे, विजय आढाव, छावा संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष कैलास बोरावके, जिल्हाध्यक्ष युसुफ शेख, उत्तमराव चरमळ, नगरसेवक स्वप्निल निखाडे, प्रसाद आढाव, विजय आढाव, दिनेश कांबळे आदी उपस्थित होते.
कोल्हे म्हणाले, मतदारांनी आम्हा पाच वर्षांतून एक मत दिल्यानंतर आम्ही त्या मतदार बंधू भगिनींचे ऋण व्यक्त करण्यासाठी बारा महिने चोवीस तास संपूर्ण कोल्हे परिवार जनसेवेसाठी प्रयत्नशिल असते. मतदार संघातून रात्री-अपरात्री कोणचाही फोन आला तर मी स्वत:फोन उचलुन त्यांच्या संकटाचे निवारण करतो. गोदावरी नदीला आलेला महापूर, दुष्काळ, साथीचे रोग अशा विविध संकटाच्यावेळी संजीवनी उद्योग समूह नेहमीच सज्ज असतो.
निवडणुकीवर डोळा ठेवून आम्ही दिखावा करीत नाही तर या मतदारसंघातील प्रत्येक नागरिक आमच्या परिवारातील आहेत. ही सद्भावना आमच्या मनी असते. इतके चांगले काम केले तरी विरोधक आमच्या नावाने ओरडतात. स्वत: एखादी दुधाची पिशवी कधी संकटग्रस्तांना दिली नाही. तेच आज मतं मागत आहेत असा टोला बिपीन कोल्हे यांनी विरोधकांना लगावला.
कैलास बोरावके म्हणाले की, कोल्हे परिवाराची जनमाणसाबद्दल असलेली तळमळ व आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या विकास कामामुळे प्रभावित झालो आहोत. मतदार संघातील विकासाला चालना देण्यासाठी छावा संघटना कोल्हे परिवारा बरोबर राहणार.
सुमित कोल्हे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीला एकत्र करून स्वराज्याचे तोरण बांधले. कोणताही जातीभेद केला नाही. जनतेच्या कल्याणासाठी शेतकऱ्यांच्या हितासाठी आपले स्वराज्य उभा करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारेनेनुसार आपण मतदारसंघामध्ये संघटन करीत आहोत. जन माणसांच्या कल्याणासाठी महायुतीचा उमेदवार म्हणून स्नेहलता कोल्हे यांना सहकार्य करण्याचे आवाहन करत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले.
यावेळी गणेश कानडे, संतोष वाघ, संदीप अनर्थे, महेश गायकवाड, स्वप्नील गायकवाड, अशोक जाधव आदी छावा मराठा संघटनेसह मुस्लिम छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून कोल्हे यांना पाठिंबा दर्शवला आहे. त्यामध्ये युसुफ शेख, कलीम शेख, खिजर मनियार, आसिफ सय्यद, खलील पठाण, तनवीर शेख, जुबेर रंगरेज आदी कार्यकर्ते सहभागी झाले.