मुंबई – बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढल्याने राज्यात आता मान्सून आणखी दमदारपणे कोसळण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार कोकणासह, घाटमाथा, पूर्व विदर्भात पावसाचा जोर वाढणार आहे. रायगड, रत्नागिरीसह पुणे, साताऱ्याच्या घाटमाथ्यावर अति जोरदार पावसाचा “रेड अलर्ट’ हवामान विभागाने दिला आहे.
दरम्यान, राज्यातील तुरळक भाग वगळता बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ व कोकणात नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. अनेक ठिकाणी पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या मराठवाड्यालाही दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा “यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. येथे विजांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
रेड अलर्ट : रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा.
ऑरेंज अलर्ट : पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नांदेड, गोंदिया, भंडारा, गडचिरोली.
येलो अलर्ट : जळगाव, नाशिक, नगर, सोलापूर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली, लातूर, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, चंद्रपूर.
नगरमध्ये सतर्कतेचा इशारा
प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सुरू झालेल्या पावसाने बुधवारी अहमदनगर जिल्ह्यात सर्व दूर हजेरी लावली, शहरात संततधार सुरू होती. त्यामुळे जिल्ह्यात दोन दिवस यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.तसेच पावसामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचे आदेश दिले आहेत. पावसामुळे प्रवरा, गोदावरी व भीमा नदीपात्रातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.
पंचगंगेची पाणीपातळी 42 फुटावर
पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडून धोका पातळीच्या दिशेने जात आहे. सध्या ती 42 फुटावरून वाहत असून आणखी एक फुट पाणी वाढल्यास कोल्हापूर जिल्ह्यास महापुराचा धोका संभवणार आहे.
कोल्हापूरला असलेल्या संभाव्या पुराच्या धोक्यामुळे प्रशासनाने नदी काठावरील गावांना सतर्कतेची सूचना दिली आहे. अनेक गावात नागरिकांचे स्थलांतर सुरू करण्यात आले आहे. तसेच, त्याचमुळे पुढील आदेश येईपर्यंत येथील शाळाही बंद ठेवण्यात आल्या आहेत.
तानसा धरण ओव्हरफ्लो
मुंबईला पाणीपुरवठा करणारे तानसा आणि विहार धरण भरले आहेत. मुंबईला पाणीपुरवठा करणारे सातपैकी तीन धरणे भरली आहेत. तानसा धरणात 94.27 टक्के तर विहार धरणात 95.75 टक्के पाणीसाठा आहे. सातही धरणांमध्ये 55 टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा आहे. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.