नवी दिल्ली – ट्रॅक्टर संचलनावेळी झालेल्या हिंसाचारात काही शेतकरी नेतेही सामील होते, असा दावा दिल्लीचे पोलीसप्रमुख एस. एन. श्रीवास्तव यांनी केला आहे. यातच मिळालेल्या माहितीनुसार. हिंसाचारात सामील असणाऱ्यांची ओळख पटवण्यासाठी २०० सीसीटीव्ही आणि व्हिडिओ फुटेजचा आधार घेतला जात आहे. या फुटेजच्या आधारे पोलिसांना हिंसाचारासाठी जबाबदार असणाऱ्यांची ओळख पटली आहे. त्या संशयित लोकांवर लवकरच पोलिसांकडून कसून चौकशी होणार आहे.
दरम्यान, दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या गाझीपूर बॉर्डरवर तणावाची परिस्थिती कायम असून आता उत्तर प्रदेश सरकारने आंदोलनाची जागा शेतकऱ्यांना खाली करण्याचे आदेश दिले. याच ठिकाणी गेल्या 60 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. तसेच शेतकरी नेत्यांविरोधात गुरुवारी दिल्ली पोलिसांनी लुकआऊट नोटिसा जारी केल्या. तसेच लाल किल्ल्यातील हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला. तसेच, त्या हिंसाचारासाठी जबाबदार धरले जात असलेल्या दीप सिद्धू या पंजाबी अभिनेत्याविरोधातही गुन्हा नोंदवला.