पिंपळे गुरव – करोनाने गेल्या सुमारे दोन वर्षांपासून जगभर थैमान घातले आहे. त्यामुळे करोना प्रतिबंधक लस घेणे सर्वांना बंधनकारक करण्यात आले असून सार्वजनिक ठिकाणी वावरताना लस घेतल्याचा पुरावा दाखवावा लागतो. मात्र, सध्या तो क्वचितच ठिकाणी पाहिला जात असून लसीचे दोन्ही डोस घेतल्याची माहिती केवळ कागदावरच राहत असल्याचे चित्र दिसत आहे.
करोनाच्या दोन्ही लाटेत नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तिसरी लाट सौम्य होती. त्यातून सावरताना आजूनही कसरत करावी लागत आहे. करोनामुळे सर्व आर्थिक व्यवहार थंडावले असल्याने नागरिक आता कोणतेही निर्बंध पाळण्याच्या मानसिकतेमध्ये नाहीत. त्यामुळे ते बाहेर पडून सावरण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. सरकारनेही निर्बंध शिथिल केले असले तरी मास्क आणि लसीचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक केलेले आहे.
शहरातील अनेक मॉल, जलतरण तलाव, हॉटेल सुरू आहेत. काही ठिकाणी लसीचे दोन्ही डोस घेतल्यास परवानगी, तसेच मास्क आवश्यक आशा आशयाचे फलक लावलेले आहेत. मात्र, प्रत्यक्षात तेथे कोणीही तपासणी करताना दिसत नाही. दोन्ही डोस घेतल्याचा पुरवाही कोणी मागत नसल्याचे दिसून येत आहे. ग्राहक थेट प्रवेश करतात. काम करून येत परत येतात,तेव्हाही चौकशी करताना कोणीच दिसत नाही. त्यात एखादा करोना बाधित असेल तर इतरांनाही त्याची बाधा होण्याची दाट शक्यता आहे.
त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी फिरताना तोंडावर मास्क आणि लसीचे दोन्ही डोस घेतल्याची खात्री होणे आवश्यक आहे. अन्यथा एखाद्यामुळे पुन्हा करोना महामारीला सामोरे जाण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. त्यामुळे निर्बंध जरी शिथील असले तरी नियमांचे पालन काटेकोरपणे होणे आवश्यक आहे.
थिएटर, मॉल, हॉटेल आणि इतर सार्वजनिक ठिकाणी फिरताना लसीचे दोन्ही डोस व तोंडावर मास्क लावणे बंधनकारक आहे. तशा आशयाचे फलकही संबंधित ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. मात्र, प्रत्यक्षात तेथे तपासणी होताना दिसत नाही. त्यामुळे हे फलक नुसतेच शोभेसाठी असल्याचा दिसून येत आहे. फलक शोभेसाठी का?
प्रवासासाठी लसीचे दोन डोस घेतल्याचा युनिव्हर्सल पास आवश्यक आहे. लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या अनेकांनी युनिव्हर्सल पास स्मार्ट कार्ड काढून घेतले. शहरातील अनेक प्रभागातील स्थानिक लोकप्रतिनिधींनी त्यासाठी शिबिर घेतली आहेत. नागरिकांना ती घरपोचही केली जात आहेत. मात्र, त्याचा वापर होणे आवश्यक आहे.