पिंपरी – पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) संचलन तुटीपोटी पिंपरी-चिंचवड महापालिका 40 टक्के प्रमाणात म्हणजेच दरवर्षी कोट्यवधी (अंदाजे पावणे दोनशे कोटी) रुपयांचा निधी उपलब्ध करून देत असतानाही पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीमध्ये मात्र पुण्याच्या तुलनेत अत्यल्प सेवा दिली जात आहे. तसेच बसही अपुऱ्या दिल्या जात असल्याने प्रवाशांची तारांबळ कायम आहे. त्यातच आता प्रवासी संख्या घटत असल्याचे कारण देत तब्बल 30 बस कमी करण्यात आल्याने प्रवाशांच्या अडचणीत आणखीनच वाढ झाली आहे.
संचलन तुटीपोटी महापालिका पीएमपीला दरवर्षी सुमारे पावणे दोनशे कोटी रुपयांचा निधी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून दिला जाता. एवढी रक्कम महापालिका मोजत असल्याने पिंपरी-चिंचवडमध्ये जादा बस देणे गरजेचे आहे. मात्र, तसे होताना दिसून येत नाही. राज्य सरकारच्या सुचनेनुसार, पीएमटी आणि पीसीएमटीचे विलीनीकरण करून “पीएमपी’ची स्थापना करण्यात आली आहे. पीएमपीला पिंपरी-चिंचवड महापालिकेने 40 टक्के प्रमाणात तर, पुणे महापालिकेने 60 टक्के प्रमाणात संचलन तुटीची रक्कम द्यावी, असे निश्चित झाले होते. त्यानुसार दोन्ही महापालिका पीएमपीला संचलन तुटीची रक्कम देत आहेत.
पिंपरी महापालिका 40 टक्के प्रमाणात संचलन तुटीपोटी पीएमपीला रक्कम मोजत असताना एकुण बसेसच्या तुलनेत आतापर्यंत कधीच पीएमपीने पिंपरी-चिंचवडकरांसाठी चाळीस टक्के बसेस उपलब्ध करून दिलेल्या नाहीत हे वास्तव आहे. सध्या पिंपरी-चिंचवड शहरासाठी सोडण्यात येणाऱ्या बसचे प्रमाण हे एकूण बसच्या प्रमाणात केवळ 26 टक्के इतके आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडसाठी सध्या एकूण 1 हजार 390 बस सोडण्यात येत आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये भोसरी, निगडी आणि पिंपरी असे तीन बस डेपो कार्यरत आहेत. या डेपोंच्या माध्यमातून 360 बस सोडल्या जातात. तर, त्यामधीलही 30 बस कमी करण्यात आल्या आहेत. पुणे येथे 10 बस डेपोंच्या माध्यमातून एकूण 1030 बस सध्या सोडण्यात येत आहेत. पुण्याच्या तुलनेत अत्यल्प सुविधा पिंपरी-चिंचवडकरांसाठी दिली जात असतानाच पुन्हा बसेस कमी केल्यामुळे प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
प्रवाशांच्या सुविधांमध्ये कमतरता
शहरातील विविध मार्गांवर थेट
-अपुरी बससेवा
-अनेक ठिकाणी थेट बस नसल्याने प्रवाशांना बस बदलून करावा लागतो
– प्रवास बसेसची वारंवारता कमी असल्याने अर्धा-अर्धा तास प्रतीक्षा
-बीआरटी थांब्यांवर येणाऱ्या बस, बस मार्ग आदींच्या माहिती
-फलकाचा अभाव
-नव्याने समाविष्ट गावांमध्ये अत्यंत कमी संख्येने सोडल्या जातात बसेस