मुंबई – अर्थसंकल्पानंतर शेअर बाजार निर्देशांकांत बरीच वाढ झाली होती. त्यामुळे काही गुंतवणूकदारांनी माहिती-तंत्रज्ञान, वित्त आणि बॅंकिंग क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची विक्री करून नफा काढून घेतल्यामुळे शेअर बाजार निर्देशांक घसरले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 770 अंकांनी कोसळून 58,788 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 219 अंकांनी म्हणजे 1.24 टक्क्यांनी कोसळून 17,560 अंकाबर बंद झाला.
जागतिक बाजारातून नकारात्मक संदेश येण्याबरोबरच सेवाक्षेत्राचा उत्पादकता निर्देशांक कमी झाल्याचे वृत्त सकाळी आल्यानंतर गुंतवणूकदारांनी नफेखोरी करणे पसंत केल्याचे जीओजी वित्तीय सेवा या संस्थेचे विश्लेषक विनोद नायर यांनी सांगितले. वाहन आणि ग्राहक वस्तू क्षेत्र वगळता इतर सर्व क्षेत्राचे निर्देशांक आज कमी झाले. मिड कॅप आणि स्मॉल कॅपला 0.90 टक्क्याचा फटका बसला.
युरोपियन रिझर्व बॅंकेची बैठक चालू आहेत. त्यामुळे गुंतवणुकदार सावध आहेत.
वाढत्या महागाईचा सामना करण्यासाठी अगोदरच अमेरिकेच्या रिझर्व बॅंकेने व्याजदरात वाढ करण्याचे संकेत दिले आहेत. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून विक्री चालूच असून काल या गुंतवणूकदारानी 183 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केल्याची आकडेवारी
शेअर बाजारानी जारी केली. एचडीएफसी, इन्फोसीस, एल अँड टी, बजाज फिन्सर्व, बजाज फायनान्स, टेक महिंद्रा, कोटक बॅंकेच्या शेअरची नफ्यासाठी विक्री झाली. मात्र मारुती, टायटन, स्टेट बॅंक या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ नोंदली गेली.
टायर कंपन्या पिछाडीवर
साखळी पध्दतीने व्यवहार केल्यामुळे स्पर्धा आयोगाने टायर कंपन्यावर 1,788 कोटी रुपयाचा दंड ठोठावला आहे. त्यामुळे या कंपन्यच्या शेअरची बरीच विक्री झाली. पाच कंपन्यानी संगनमत करून चढ्या भावाने विक्री केल्याचे आयोगाने म्हटले आहे. आयोगाने अपोलो टायरला 425 कोटी, एमआरएफला 622 कोटी, सिएटला 252 कोटी, जे के टायरला 309 कोटी व बिर्ला टायरला 178 कोटी रुपयाचा दंड केला आहे.