पुणे (मिलन म्हेत्रे) –
ध्यास लागे आम्हाही पंढरीची । वाटे पाहे पंढरी विठू आमची ।।
मूक भावना असे आमुची खरी । डोळ्यांना आस राऊळी दर्शनाची
कर्नाटकातील अंकलीहून शितोळे सरकारांच्या वाड्यातून 31 मे 2023 ला प्रस्थान झालेल्या माउलींच्या दोन्ही अश्वांचे आज (दि. 8) पुण्यात आगमन झाले आहे.हिरा आणि मोती या अश्वदयींचा हा यंदाचा पायी प्रवास तसा खडतर होता. उन्हाच्या तीव्र झळा सहन करीत आणि प्रचंड तापलेल्या रस्त्याने येताना या अश्वांना खरोखरच दिव्य करावे लागले असणार. विसाव्याच्या ठिकाणी आणि मुक्कामी देखील त्यांची काळजी घेतली गेली आहे. भर उन्हात प्रवास न करता सकाळी आणि संध्याकाळी शक्यतो प्रवास करीत हे अश्व पुण्यात आले आहेत.
पुण्यातील रास्ते वाड्यात त्यांचा आजचा आणि उद्याचा (दि. 9) मुक्काम आहे आणि त्यानंतर अश्व शनिवारी (दि. 10) पहाटे आळंदीकडे प्रस्थान ठेवतील. पुणे आळंदी मार्गावरील बिडकर वाड्यात (श्रीकृष्ण मंदिर) येथे सरदकर अर्पितसिंह बिडकर परिवारातर्फे अश्वांचे स्वागत केले जाते. येरवड, थोरल्या पादुकामार्गे अश्व आळंदीत पोहोचतील. त्यानंतर परंपरेनुसार ज्ञानेश्वर पालखी सोहळ्यातर्फे दिंडीचे मालक आणि आळंदी देवस्थानतर्फे स्वागत करण्यात येणार आहे.
वारी काळात अश्वांच्या सुरक्षिततेसाठी विसाव्याच्या आणि मुक्कामाच्या ठिकाणी बॅरिकेट्स असावेत, याचबरोबर उन्हा-पावसापासून संरक्षणासाठी त्यांचे तंबू योग्य ठिकाणी छतांसह असावेत, यासाठी सरकारने काही तबवीज करावी यासाठी सरकारकडे मागणी केली आहे. अश्वांच्या सुरक्षिततेसाठी आमच्याकडून योग्य काळजी घेतली जातेच; पण अनेकवेळा वारीतील प्रवास, मुक्काम आणि रिंगण यावेळी त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो आहे. त्यांच्या मार्गावरील धूळ कपाळाला लावण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने त्यांच्या दिशेन धावतात, यामुळे अश्वांना त्रास होतो. त्यामुळे त्यांच्या संरक्षणासाठी सरकारतर्फे उपाययोजना होणे अत्यंत आवश्यक आहे.
– महादजी शितोळे सरकार (अंकलीकर)
रिंगण सोहळा
सोहळ्यात रिंगण सोहळ्यांना महत्त्वाचे स्थान आहे. पुरंदवडीत पहिले, खुडूस फाटा येथे दुसरे, ठाकूरबुवांची समाधी येथे तिसरे आणि बाजीराव विहिर येथे गोल रिंगण पार पडेल. यानंतर लोणंद, भंडी शेगाव आणि वाखरीत उभे रिंगण पार पडणार आहे.
तुकाराम कोळींचे स्थान अढळ : अंकलीचे तुकाराम कोळी यांचे स्वाराच्या अश्वावरील स्थान अढळ आहे. यंदाही ते वारीतील सोहळ्यात सहभागी असून, स्वाराचा मानाचा पोशाख घेऊन रिंगण सोहळ्यासाठी आणि वारीतील भावपूजेसाठी ते सज्ज आहेत.
“राजा’ची देखभाल…
प्रकाश लाडाने गेल्या 12 वर्षांपासून “राजा’ची वारी काळात देखभाल करतात. त्यांचे आणि राजाचे हे वारीचे 12 वे वर्ष आहे. बाभुळगाव पेठ येथून अवघ्या 10 किलोमीटरवरील केकर-जवळा हे त्यांचे मूळ गाव आहे. हा अश्व देवाचा असल्याने त्याच्यावर कोणी स्वार होत नाही. बेलवडी, इंदापूर, अकलूज येथे गोल रिंगण आणि माळीनगर, वाखरी, पंढरपूर येथे उभे रिंगण होते. या सोहळ्यात अश्वांची काळजी त्यांचे देखभाल करणारे अत्यंत योग्य पद्धतीने घेतात.