पुणे -अगामी लोकसभा, विधानसभा तसेच महापालिका निवडणुकांसाठी भाजपने पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी कामाला सुरूवात केली असून पुणे लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या मुरलीधर मोहोळ यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. तर त्याच वेळी जगदीश मुळीक यांच्याकडे शहराचा कारभार असतानाही महापालिका निवडणुकांची धुरा राजेश पांडे यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यामुळे, पक्षात उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या नियुक्त्या गुरूवारी जाहीर केल्या आहेत.
विशेष बाब म्हणजे, भाजपकडून सध्या केवळ लोकसभांवर लक्ष केंद्रीत केले असताना; तसेच, महापालिकांच्या निवडणुकांची वेळ अनिश्चित असताना अचानकपणे फक्त पुण्यातच निवडणूक प्रमुख म्हणून पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
काही महिन्यांपूर्वीही पांडे यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, त्यावरून भाजप शहराध्यक्ष मुळीक नाराज झाले आणि त्यांनी थेट शहराची जबाबदारी आपल्याकडेच असल्याचे पत्र काढले. त्यामुळे पक्षाकडून पांडे यांचे पद बदलत त्यांना “निवडणूक व्यवस्थापन प्रमुख’ असे पद देण्यात आले. त्यामुळे हा वाद मिटला, असे वाटत असतानाच आता काही महिन्यानंतर अचानक पुन्हा पांडे यांना थेट महापालिका निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आल्याने भाजपमध्ये अंतर्गत वाद उफळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
…यासाठी विभागली जबाबदारी
भाजपकडून लोकसभेसाठी मुरलीधर मोहोळ, पालिका निवडणूक पांडे यांच्याकडे तर शहराध्यक्ष म्हणून जगदीश मुळीक काम पाहत असल्याने तीनही पदाधिकाऱ्यांवर शहरातील पक्षसंघटन तसेच नगरसेवकांची जबाबदारी असणार आहे. विशेष म्हणजे या तीनही पदाधिकाऱ्यांना माजी नगरसेवक, आमदार यांच्या सोबतच काम करून लोकसभा, विधानसभा आणि महापालिकेचे काम सांभाळावे लागणार आहे.
कसबा विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी मुळीक तसेच पांडे यांच्याकडे होती. ते थेट जबाबदारीच्या प्रक्रियेत समाविष्ट नसले निवडणुकीची रणनिती, प्रत्यक्ष स्थिती तसेच इतर बाबींसाठी निरिक्षक म्हणून त्यांच्याकडे राज्यातील नेत्यांना फीडबॅक देण्याचे काम असल्याची चर्चा होती. मात्र, या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्याचे खापर मात्र पक्षाचे उमेदवार असलेल्या हेमंत रासनेंवर फोडण्यात आले. त्यामुळे, आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर कसब्याचा परिणाम नको म्हणून पक्षाकडून तीन पदाधिकारी विभागले असले तरी त्यांची जबाबदारी मात्र एकच असल्याने पक्षात अंतर्गत वाद उफळण्याची शक्यता आहे. तर, कोणताही एक पदाधिकारी वरचढ होऊ नये यासाठी ही खेळी असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.