दुष्काळग्रस्तांचे मुंबई, पुणे शहरात स्थलांतर
मुंबई – राज्यातील दुष्काळाची दाहकता प्रचंड वाढली असताना भाजप-शिवसेना सरकारचे नियोजन मात्र कुठेच दिसत नाही. चारा व पाण्याची अनुपलब्धी राज्यभर जनतेच्या जीवावर उठली आहे. दुष्काळ निवारणाबाबतचे सरकारचे नियोजन ढेपाळल्याने दुष्काळी भागातून नागरीकांचे मुंबई, पुणे शहरात मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केला आहे.
राज्यातील भीषण दुष्काळासंदर्भात पत्रकारांशी बोलताना दुष्काळ निवारणाबाबत केल्या जाणाऱ्या उपाययोजना राबविण्यास सरकारला आलेल्या अपयशाबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर जत भागात तर जुन्नरमध्ये गिरीश महाजन नुकतेच भेट देण्यास गेले असता या दोन्ही मंत्र्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. यातूनच जनता किती त्रस्त आहे हे दिसून येते. पण सरकारी पातळीवर मात्र दुष्काळाकडे गंभीरपणे पाहिले जात नाही असे चित्र आहे, असे ते म्हणाले. दुष्काळी स्थितीचा सामना करण्यासाठी सरकार सज्ज असून केंद्र सरकारकडून राज्याला निधी मिळाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. मग हा निधी दुष्काळी जनतेला पावसाळा सुरु झाल्यानंतर देणार आहात का? केंद्राकडून मदत मिळवण्यात एवढी दिरंगाई का झाली? असा संतप्त सवाल त्यांनी केला.
दुष्काळग्रस्त मराठवाड्यासह, सोलापूर व इतर भागातून स्थलांतराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. या भागातले लोक पुणे, मुंबईसारख्या शहरात नातेवाईकांकडे आसरा घेऊ लागले आहेत. तर काही लोकांना मुंबईच्या फुटपाथ, उड्डाणपुलाच्या खाली मोकळ्या जागेचा आधार घ्यावा लागत आहे. अशा दुष्काळग्रस्त स्थलांतरीत नागरीकांना राज्य सरकारने योग्य ती मदत देण्याची गरज आहे, असे चव्हाण म्हणाले. दुष्काळाची दाहकता प्रचंड आहे, पाण्याची समस्या जशी उग्र बनली आहे, तशीच रोजगाराची समस्याही आहे. सरकारचे नियोजन नसल्यामुळेच सामान्य जनतेला त्याची मोठी झळ बसत असल्याने दुष्काळी परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे.