हेमंत देसाई
देशात पुन्हा सत्ता मिळवायची असल्यास उत्तर प्रदेशात दणदणीत विजय मिळवावा लागेल, हे भारतीय जनता पक्षाला पक्के ठाऊक आहे. शेतीमालाला मिळणारे अल्प भाव, ऊस शेतकऱ्यांची राहिलेली दहा हजार कोटी रुपयांची थकबाकी आणि अन्य राज्यांच्या तुलनेत उत्तर प्रदेश शेतकऱ्यांची असलेली आर्थिक दुर्गती हे तेथील कळीचे प्रश्न आहेत. त्यामुळे मुळातच मोदी व योगी आदित्यनाथ सरकारविरुद्ध तेथील वातावरण आहे. बसपाच्या नेत्या मायावती यांच्याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अचानक सहानुभूती वाटायला लागली आहे. आता ही सहानुभूती बसपा व सपा या दोन पक्षांत दरी निर्माण करण्यासाठी केली असण्याची सध्यातरी जास्त शक्यता वाटते. भाजपाची ही दुहेरी चाल किती यशस्वी ठरते हे निवडणूक निकालावर अवलंबून आहे.
समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी आणि राष्ट्रीय लोकदल यांच्या महागठबंधनमुळे भाजपला घाम फुटलेला आहे. म्हणूनच महागठबंधनचा उल्लेख सातत्याने “महामिलावट’ असा करून, बसपा व सपा हे दोन्ही पक्ष संधिसाधू आहेत, आपण केलेल्या लुटीचे संरक्षण करण्यासाठी ते एकत्र आलेले आहेत, अशी तोफ नरेंद्र मोदी डागत आहेत. उत्तर प्रदेशात बुआ-भतीजा, म्हणजेच मायावती व अखिलेश यादव यांचे समीकरण चांगले जुळले आहे. निवडणुकीसाठी ज्या बैठका होतात, त्या बहुतेक वेळा मायावतींच्या निवासस्थानी होतात. तेथे अखिलेश जातात. जाहीरपणे आणि व्यक्तिशः मायावतींशी अत्यंत आदराने व सौजन्याने व्यवहार करतात.
एवढेच नव्हे, तर मुलायमसिंह व मायावती यांना एकाच मंचावर आणण्यातही त्यांनी यश मिळवले. बसपा व सपाची मते एकमेकाकडे ट्रान्सफर होणार नाहीत, असे मांडे भाजप मनातल्या मनात खात होता. पण तसे घडताना दिसत नाही. त्यामुळे आता करावे तरी काय, असा प्रश्न पडून मोदींनी आणखीन एक शक्कल लढवली. प्रतापगड येथे घेतलेल्या सभेत भाषण करताना ते म्हणाले, अनेक सभांमधून कॉंग्रेसचे नेते सपा नेत्यांच्याबरोबर व्यासपीठावर बसत आहेत. सपा व कॉंग्रेस मिळून बहेनजींना, म्हणजेच मायावतीना दगा देत आहेत आणि बहेनजींना याची कल्पनाही नाही. म्हणजे, सपा व बसपा यांच्यात संशयकल्लोळ निर्माण व्हावा हाच यामागील हेतू होता.
जवळपास गेली 20 वर्षे सपा-बसपा यांचे हाडवैर होते. आता उत्तर प्रदेशातील 80 जागा बहेनजी, अखिलेश आणि अजितसिंग यांनी आपापसात वाटून घेतल्या आहेत. भाजपविरुद्ध देशव्यापी आघाडी निर्माण व्हावी, असा उद्देश कॉंग्रेसने मनात बाळगला होता; परंतु सपा-बसपाने आपल्या महागठबंधनमध्ये कॉंग्रेसला घेतलेच नाही आणि तरीही रायबरेली व अमेठीमधून सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या विरोधात उमेदवार उभा न करण्याचे धोरण महागठबंधनने निश्चित केले. सपा व कॉंग्रेसचे आतून सूत जुळले आहे, अशी कंडी पिकवून झाल्यावरदेखील बहेनजींनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील दोन मतदारसंघांत आमचा कॉंग्रेसलाच पाठिंबा असेल, हे जाहीर केले.
बहेनजी सांगतील त्या दिशेला त्यांचे मतदार जातात, हे लक्षात घेतले पाहिजे. तसेच निवडणुकीच्या प्रचारात राहुल वा प्रियांका गांधी यांनी सपा-बसपाविरुद्ध टीका करण्याचे शक्यतो टाळले. नुकतेच राहुल गांधी म्हणालेच की, ज्या ज्या मतदारसंघात कॉंग्रेसचा उमेदवार तगडा आहे, तेथे आम्ही त्याच्या विजयासाठी शिकस्तच करत आहोत आणि जेथे तसे नाही, तेथे भाजपविरोधातील प्रबळ उमेदवारास (म्हणजे महागठबंधनचा उमेदवार) आमची सहानुभूती असेल. मोदी सरकार पुन्हा न येऊ देणे हेच कॉंग्रेस व महागठबंधनचे समान उद्दिष्ट आहे. अनेक ठिकाणी कॉंग्रेसने भाजपची मते खाण्यासाठी उमेदवार उभे केले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या तीन पक्षांत नेमकी काय ऍरेजमेंट होती, ते निकालानंतरच समजेल.
2016 साली उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांत कॉंग्रेस व सपाची आघाडी होती. “यूपी के लडके’ अशी कॅप्शन देऊन राहुल-अखिलेशची बॅनर्स राज्यभर झळकली होती. परंतु विधानसभेत या दोन्ही पक्षांचे पानिपत झाले. लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसबरोबर जाण्यास सपाची तयारी होती. परंतु बसपाचा त्यास विरोध होता. याचे कारण उत्तर भारतातील अन्य राज्यांत बसपाशी आघाडी करण्यास कॉंग्रेसने नकार दिला होता. गेल्या आठवड्यात प्रियांका गांधी-वढेरा वार्ताहराजवळ बोलताना म्हणाल्या की, कॉंग्रेसचे जे उमेदवार जिंकतील वा भाजपची मते खातील, अशांची आम्ही एक यादीच तयार केली आहे. हे ऐकल्यानंतर भाजपने “व्होट कटुआ’ म्हणून कॉंग्रेसची खिल्ली उडवली.
शिवाय जेथे सपाचे उमेदवार आहेत, तेथेच कॉंग्रेस मदत करत आहे आणि बसपाला मात्र कॉंग्रेसने वाऱ्यावर सोडले आहे, असे मोदींनी सुचवले. यातून बहेनजींची सहानुभूती मिळवावी आणि निवडणुकीनंतर त्रिशंकू लोकसभा अस्तित्वात आल्यास, बसपा भाजपकडे वळू शकेल, ही शक्यता वर्तवायची अशी ही दुहेरी चाल आहे. उत्तर प्रदेशात बसपा व सपा हेच भाजपसमोरचे प्रमुख आव्हान आहे. त्यामुळे त्यांना खच्ची करण्यासाठी कॉंग्रेसला हवा द्यायची ही खेळी आहे. याचा अर्थ, आपल्या विरोधातील थोडी मते कॉंग्रेसकडे वळली तरी चालतील, कारण त्यांचे उमेदवार तर निवडून येणारच नाहीत. पण या व्यूहरचनेमुळे बसपा-सपाला मात्र फटका बसेल, असा हेतू आहे. म्हणूनच उत्तर प्रदेशात मोदी मुख्यतः कॉंग्रेस व राहुल गांधी यांना लक्ष्य करत आहेत. कधी नेहरू, कधी इंदिरा गांधी, तर कधी राजीव गांधी यांना लक्ष्य करत आहेत. त्यासाठीच पातळी सोडून त्यांनी राजीव गांधी यांच्यावर हल्ला चढवला. विजय मिळवण्यासाठी मोदी कोणत्याही थराला जायला तयार असतात, हेच यातून
स्पष्ट झाले.