Election Bonds – मोदी सरकारने निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून कोणत्या राजकीय पक्षाला कोणी किती देणगी मिळाली याचा तपशील लपवण्याचाच सातत्याने प्रयत्न केला असून हा तपशील जाहीर करण्यास मोदी सरकारला कशाची भीती वाटते आहे असा सवाल कॉंग्रेसने केला आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी या संबंधात एक्सवर मोदींना उद्देशून काही प्रश्न विचारले आहेत. या सरकारने न्यायालयीन आदेशाचे पालन करण्याची मुलभूत जबाबदार टाळण्याचा का प्रयत्न केला असा सवाल त्यांनी केला आहे. निवडणूक रोख्यांचा तपशील जाहीर झाला तर आपला मोठा घोटाळा बाहेर येण्याची या सरकारला भीती वाटत असावी असे त्यांनी म्हटले आहे.
“20 फेब्रुवारी 2024 रोजी, ईडी, सीबीआय किंवा आयटी विभागाने छापे टाकल्यानंतर किंवा तपास केल्यानंतर लगेचच भाजपला ३० कंपन्यांकडून ३३५ कोटी रुपयांची देणगी मिळाल्याचे उघड झाले. या कंपन्यांनी त्यांच्यावर छापा टाकण्यात आल्यानंतर लगेच भाजपला देणगी का दिली? असा सवालही त्यांनी केला आहे.
भाजप या कंपन्यांना ईडी-सीबीआय-आयटी तपासाची धमकी देऊन त्यांच्याकडून देणग्या उकळत आहे का, असा सवाल त्यांनी केला. निवडणूक आयुक्त अरूण गोयल यांनी राजीनामा का दिला असा सवालही त्यांनी मोदी सरकारला विचारला आहे.