मुंबई – महाविकास आघाडीचा आज मुंबईत महामोर्चा काढला जाणार असून त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी आमदार-खासदारांकडून शिवाजी महाराजांविषयीची वादग्रस्त वक्तव्य, राज्यपालांची विधानं आणि राज्यातून बाहेर जाणारे उद्योग या मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक झाले आहेत. आणि या मोर्चातून सरकारचा निषेध केला जाणार आहे. सकाळी 10.30 वाजता या मोर्चाला सुरुवात झाली असून, भायखळा ते आझाद मैदान असा महामोर्चाचा मार्ग असणार आहे.
शिवाय, याठिकाणी सभादेखील होणार असून त्यावेळी महाविकास आघाडीतील नेतेमंडळी सत्ताधारी भाजपा आणि शिंदे गटावर आक्रमक टीका करण्याची शक्यता आहे. दरम्यान, यापूर्वीच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर टीकास्त्र सोडल्याच पाहायला मिळालं आहे. यावेळी ते माध्यमांशी संवाद साधत होते.
संजय राऊत म्हणाले, “हा मोर्चा काढला जात असताना आमच्यावरच अटी लादल्या जात आहे. भाषणात अमुक शब्द वापरू नये, असे बंधन घालण्यात आले आहे. या अटींपेक्षाच या सरकारने आम्हाला भाषण लिहून द्यायचे होते, आज होणारा मोर्चा हा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा असेल. असं ते म्हणाले.
यावेळी राऊत पुढे म्हणाले, ‘महाराष्ट्रप्रेमींचा आज मोठा मोर्चा निघणार आहे. त्यापूर्वीच सरकारचे पाय लटपटले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले या महापुरुषांचा अपमान महाराष्ट्रात सुरू आहे. या अपमानाला विरोध करणाऱ्यांची अडवणूक सरकारकडून सुरू असल्याची टीका त्यांनी केली.
दरम्यान, दुसरीकडे भाजपाकडूनही मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून ‘माफी मांगो आंदोलन’ केलं जाणार आहे. ठाणे-डोंबिवलीत विरोधकांना विरोध करण्यासाठी बंदची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनात जागोजागी ‘उद्धव ठाकरे माफी मागा, नाना पटोले माफी मागा, अजित पवार माफी मागा,’ असे फलक झळकावण्यात येत आहेत.