नवी दिल्ली : केंद्रीय गृह मंत्रालयाने आज जारी केलेल्या निर्देशांमध्ये आणखी काही क्षेत्रांना लॉकडाऊनच्या निर्बंधातून वगळले आहे. कृषि, बांधकाम आणि बँकिंग या क्षेत्रांचा यामध्ये समावेश आहे. सरकारकडून या संदर्भात सविस्तर आदेश जारी करण्यात आले आहेत. २० एप्रिलनंतरच ही सूट लागू करण्यात येणार आहे.
केंद्र सरकारने देशातील लॉकडाऊनमध्ये ३ मेपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. एकूण १९ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. पण २० एप्रिलनंतर ज्या ठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण नाहीत, तिथे काही प्रमाणात सूट देण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने हे निर्देश जारी केले आहेत.
या कामांना लॉकडाऊनमध्ये मिळाली परवानगी
* आदिवासी लोकांकडून केली जाणारी शेती, कृषि लागवड, पिकांची कापणी, बांबू, नारळ, कोको, मसाल्याचे पदार्थ, पोफळी यांच्यावरील प्रक्रिया, पॅकेजिंग, वाहतूक यांना लॉकडाऊनमधून सूट देण्यात आली आहे.
* अबँकिंग वित्तीय संस्थांचे कामकाज, गृह वित्त पुरवठा कंपन्या, सूक्ष्म वित्त पुरवठा कंपन्या यांना कमीत कमी कर्मचाऱ्यांसह कामकाज सुरू करण्याला मंजुरी देण्यात आली आहे.
* ग्रामीण भागातील बांधकामे सुरू करण्याला मंजुरी देण्यात आली आहे. त्याचबरोबर पाणी पुरवठ्यासाठी पाईप टाकणे तसेच दूरसंचार कंपन्यांसाठी जमिनीखालील लाईन्स टाकणे यांनाही परवानगी देण्यात आली आहे.