बाळासाहेब पाटील यांचे प्रतिपादन
कराड – आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या स्वप्नातला नवमहाराष्ट्र घडवण्याची जबाबदारी आदरणीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली तरुण युवकांनी आपल्या हातात घेऊन नवमहाराष्ट्राचे उज्ज्वल भविष्य घडवावे. त्यासाठी पुन्हा एकदा आघाडी सरकारला बहुमताने निवडून आणावे. त्यामध्ये युवकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन बाळासाहेब पाटील यांनी केले.
वाठार किरोली ता. कोरेगाव येथे आयोजित युवक मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी सुनील माने, देवराज पाटील, मानसिंगराव जगदाळे, अजितराव पाटील चिखलीकर, कांतिलाल पाटील, संभाजीराव गायकवाड, लालासो पवार, राजू शेळके, जशराज पाटील, सागर पाटील उपस्थित होते.
ते म्हणाले, सवंग लोकप्रियतेसाठी मोठमोठ्या घोषणा करून सत्तेत आलेल्या सरकारने सर्वांची घोर निराशा केली आहे.
दरवर्षी दोन कोटी तरुणांना नोकऱ्या देणार अशा वल्गना केल्या. याउलट जवळजवळ दीड कोटी लोकांना सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्याने बेरोजगारी वाढली. गेल्या पाच वर्षात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. अनेक निर्णयांमुळे सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास झाला. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, अजितराव पाटील चिखलीकर, चंद्रकांत जाधव, युवा नेते जशराज पाटील, सुहास बोराटे आदींची भाषणे झाली.