उपनगर टीम – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हा, शहर आणि पिंपरी-चिंचवडसाठी पुन्हा कडक लॉकडाऊन सोमवारी मध्यरात्रीपासून करण्यात येईल, अशी घोषणा केली. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील उपनगरांमध्ये नागरिकांची जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी एकच झुंबड उडाली आहे. त्यामुळे उपनगरांमधील किराणा दुकान, मेडिकल, भाजीपाला विक्रीचे ठिकाण, वाइन शॉप याठिकाणी गर्दी पाहण्यास मिळत आहे.
प्रत्येक नागरिकाच्या मनात पुन्हा मोठा लॉकडाऊन झाला तर आपल्या खाण्यापिण्याचे हाल होतील अशी भीती असल्याने प्रत्येकजण पिशवी घेऊन बाजारपेठ जवळ करताना दिसून येत आहे. आज रविवार असल्याने बऱ्याच कंपन्या, सरकारी कर्मचारी तसेच इतर व्यवस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुट्टी असल्याने आज रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहण्यास मिळाली. नागरिकांनी खरेदीसाठी बाहेर पडताना फिजिकल डिस्टन्स पाळला नाही. नागरिकांच्या गैरशिस्तीमुळे करोनाचा प्रसार होण्यासच अधिक मदत होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी.
लॉकडाऊनची नागरिकांमध्ये धास्ती
चऱ्होली – सोमवारपासून पुन्हा लॉकडाऊन लागू होणार असल्यामुळे रविवारी सकाळपासून नागरिकांनी अत्यावश्यक सामान खरेदीसाठी दुकानांसमोर गर्दी केल्याचे चित्र दिघी, चऱ्होली परिसरात पाहावयास मिळाले.
परिसरातील छत्रपती संभाजी महाराज चौकातील मुख्य बाजारपेठेत असणाऱ्या किराणा व भाजीच्या दुकानांसमोर नागरिकांनी खरेदीसाठी एकच झुंबड केली होती. यामध्ये अत्यावश्यक लागणारे सामान आधीच खरेदी करून नंतर होणारी अडचण टाळली जाईल व लॉकडाऊनच्या काळात सुरक्षित घरात राहून बाहेर पडणे टाळता येईल. भाजी खरेदी करताना जास्त दिवस टिकणाऱ्या भाज्यांना मागणी वाढली आहे. त्यामुळे भाज्यांचे दर वाढले आहेत. पाच दिवस कडक लॉकडाऊन असल्याने भाजी व्यावसायिकसुद्धा आणलेला माल विकून मोकळे होण्यासाठी वाजवी दरात देण्याकडे काहींचा कल दिसून आला. तर काही नागरिकांनी अचानक गाडीची गरज पडल्यास गैरसोय नको म्हणून पेट्रोल भरताना शिल्लक भरून ठेवले आहे. मागे झालेल्या लॉकडाऊनचा धसका घेतलेले नागरिक आता मागच्या सारखी परिस्थिती ओढवू नये म्हणून खबरदारी घेत आहेत. घरात लागणाऱ्या प्रत्येक वस्तूची यादी बनवून हातात थैली घेत नागरिक बाहेर पडताना दिसत आहेत.
दळणासाठी गिरणीत नागरिकांची गर्दी
चिंचवड – करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत सोमवारी मध्यरात्रीपासून पाच दिवस कडक लॉकडाऊन घोषित केला आहे. त्यामुळे चिंचवड परिसरातील महिला वर्गाने घरात गहू, ज्वारी, बाजरी या पिठांची कमतरता भासू नये यासाठी दळण घेऊन गिरणी जवळ केल्याचे चित्र शनिवार, रविवारी पाहण्यास मिळाले.
चिंचवड परिसरातील नागरिकांनी अत्यावश्यक सामान खरेदी करण्यासाठी तीन दिवसांची वेळ महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यानी देताना गर्दी न करण्याचे आवाहन केले होते. परंतु नागरिकांनी सोशल डिस्टन्सचे पालन न करता ठिकठिकाणी खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केल्याचे दिसून आले. चिंचवड गावातील गांधी पेठ, चिंचवडगाव ते पिंपरी लिंकरोड, तानाजीनगर, भाजीमंडई आदी भागांमध्ये भाजीपाला, किराणा भुसार, दळण, इतर वस्तूंच्या खरेदीसाठी रस्ते, बाजारपेठा फुलून गेल्या होत्या. गिरणीच्या दारात दळण घेताना आधी नंबर कुणाचा यासाठी वादविवाद महिलांमध्ये सुरू होते. फळविक्रेत्यांनी चढ्या भावांनी विक्री करून आपली कमाई करून घेतली. रस्त्यावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात दिसून आली.
चिखली साने चौकात गर्दी
चिखली – परिसरातील साने चौक ही मोठी बाजारपेठ आहे. या परिसरात कामगार वर्ग मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहे. बऱ्याच कामगारांचे हातावर पोट आहे. लॉकडाऊनमध्ये आपल्या कुटुंबाची हालअपेष्टा होऊ नये यासाठी रविवारी साने चौक, कस्तुरी मार्केट, भाजी मार्केट परिसरात नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. स्पाइन रोडला मद्य विक्री दुकानात मद्य खरेदीसाठी मद्यपींनी तोबा गर्दी केली होती.
रस्त्यातच हातगाडी चालकांनी फळे, भाजीपाला तसेच संसारोपयोगी साहित्यांची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनीदेखील आपली दुकाने धाटली होती. त्यामुळे भाजी मार्केट चौक ते साने चौक यादरम्यान मोठी वाहतूक कोंडी झाली होती. या परिसरात वाहने पार्क करण्यासाठी जागा नसल्याने ग्राहक आणि व्यावसायिक यांनी रस्त्यातच आपली वाहने पार्क केली होती. त्यामुळे वाहतूक कोंडी आणि नागरिकांची गर्दी यामुळे सोशल डिस्टन्सचा फज्जा उडालेला दिसून आला.
नागरिकांची खरदेसाठी लगबग
जाधववाडी – शहरातील करोना रुग्णांची संख्या आटोक्यात येत नसल्याने स्थानिक प्रशासनाने सोमवारी मध्यरात्रीपासून पुन्हा लॉकडाऊन होणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे नागरिकांनी किराणा व अन्य अत्यावश्यक वस्तू, खरेदी करण्यासाठी नागरिकांची धांदल उडाली असून, परिसरातील किराणा दुकानांसमोर मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहण्यास मिळाली. शनिवार, रविवारी रात्री उशिरापर्यंत जाधववाडीतील किराणा दुकाने सुरू होती. तरीदेखील नागरिकांची खरेदीसाठी अद्याप तेवढीच गर्दी असल्याचे चित्र आहे.
अनलॉक झाल्यानंतर अचानक लॉकडाऊनची घोषणा झाल्याने जाधववाडी, मोशी, कुदळवाडी परिसरात अनेक ठिकाणी नागरिकांनी साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी करत आहेत. बऱ्याच ठिकाणी अनलॉक करतेवेळी दुकानदारांना व्यवसाय करताना काही नियम व अटी घालून दिल्या आहेत. त्याचे पालन करतच व्यवसाय करता येणार आहे. परंतु उपनगरांमध्ये बरेच दुकानदारांनी या नियमांना केराची टोपली दाखवली आहे. किराणा दुकान, भाजीपाला केंद्र, वाइन शॉप याठिकाणी रांगा नव्हत्या न सोशल डिस्टन्स पाळले जात होते. त्यामुळे सर्वत्र सावळा गोंधळच दिसला.