दोन दिवसांत निर्णय होणार….
पुणे(प्रतिनिधी) – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज कुलगुरूंसोबत शनिवारी झालेल्या बैठकीत अंतिम वर्षाच्या परीक्षेवर कोणताच निर्णय होऊ शकला नाही. कायदेशीर बाबी तपासून येत्या दोन ते तीन दिवसांत परीक्षेचा निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे अंतिम वर्ष परीक्षेचा तिढा कायम आहे.
अंतिम वर्ष परीक्षा घेण्यावरून शिक्षण क्षेत्रातून उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व कुलगुरूंची व्हिडिओ कॉन्फकन्सींगद्वारे बैठक घेतली.
यात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, मुख्य सचिव अजोय मेहता, विभागाचे सचिव सौरभ विजयसह सर्व विद्यापीठाचे कुलगुरू सहभागी झाले होते. या बैठकीत अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणे आवश्यक असल्याचे काही कुलगुरूंनी सांगितले. राज्यातील सर्व विद्यापीठांची परिस्थिती, करोनाचा प्रभाव, परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठाची तयारी, विद्यार्थी सुरक्षा याचा आढावा घेण्यात आला.
यावर मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, “एकाही विद्यार्थ्याला विषाणूचा प्रादुर्भाव होणार नाही. याची काळजी घेऊन विद्यापीठांच्या परीक्षा घ्याव्या लागतील. त्यासाठी नेमकी परीक्षा पद्धती आणि वेळापत्रक निश्चित करून विद्यार्थी आणि पालकांची चिंता संपविली पाहिजे. तसेच सर्व वर्षांच्या सत्राच्या सरासरी इतके गूण किंवा श्रेणी प्रदान करण्याची तसेच श्रेणी सुधारासाठी ऐच्छिक परीक्षेचा पर्याय देण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून घ्या, अशी सूचना केली.
उदय सामंत म्हणाले, “पुणे, मुंबई, कोल्हापूर, अमरावती यासह इतर भागात केरोनाची स्थिती भिन्न असली तरी संपूर्ण राज्यासाठी एकच निर्णय घेतला जाणार आहे. या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांवर “कोवीड बॅच’ असा शिक्का बसणार नाही. विद्यार्थ्यांच्या करियरचा विचार करून निर्णय घेतला जाणार असल्याचे ते म्हणाले.
विद्यार्थी हिताचा निर्णय….
“कुलगुरूंच्या बैठकीत विद्यार्थ्यांचे आरोग्य, करोनाचे संकट यासह अनेक विषयावर चर्चा केली. त्यानंतर आम्ही विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेण्याच्या अंतिम पातळीवर आलेलो आहोत. मात्र, यामध्ये कोणताही कायदेशीर अडचण निर्माण होऊ नये म्हणून कायदेशीर सल्ला घेतला जाणार आहे. त्यानंतर दोन ते तीन दिवसांनी निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.