नगदी पिकांचे अतोनात नुकसान; बळीराजा हतबल
खटाव – या संपूर्ण आठवड्यात दिवसा ऊन तर रात्री मुसळधार पाऊस. सततच्या पावसाने आपल्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाणार या भितीने बळीराजा हतबल झाला आहे.
सततच्या पावसाने शेतात पाणी साचून राहिल्याने अनेक भागातील घेवडा, वाटाणा, सोयाबीन, बटाटा, कांदा, आले नगदी पिकांचे अक्षरशः नुकसान झाले आहे. शासनाच्या संबंधित यंत्रणेने या नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून शेतक-यांना या संकटातून सावरण्यासाठी योग्यती नूकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरीवर्गातून मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे.
नेहमीच कोरड्या दुष्काळाचा सतत सामना करणाऱ्या शेतकऱ्याला आता ओल्या दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे अडचणीत आला आहे. मुसळधार पावसामुळे नद्या, नाले, ओढे मोठ्या प्रमाणात झालेले सिंचन प्रकल्प तुडूंब भरल्याचा आनंद एका बाजूला तर सोयाबीन, घेवडा, बटाटा, भुईमूग, कांदा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात झालेले नुकसानाचे दुःख दुस-या बाजुला अशी अवस्था शेतकरी वर्गाची झाली आहे. गेल्या काही वर्षापासून सतत दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या तालुक्यात यंदा पावसाने सरासरी ओलांडली आहे.
गेल्या आठवड्यापासून पाऊस काही थांबण्याचे नाव घेत नाही.पाऊस असाच पडत राहिल्यास शेतकरी अडचणीत येणार यात शंकेला वाव नाही.
दिवसभर ऊन व उष्मा तर संध्याकाळी विजांच्या कडकडाटांसह पडणारा मुसळधार पाऊस. शेतीच्या कामासाठी शेतकऱ्यास उसंतच मिळत नसल्याने एकेकाळी सुखद वाटणारा हा पाऊस बळीराजासाठी मोठी डोकेदुखीच ठरू लागला आहे. याचा परिणाम सर्वच स्तरावर दिसून येत आहे.
अनेकांची शेते पावसामुळे पाण्याखाली गेल्याने शेतात पाऊल टाकणे देखिल मुश्किल झाले आहे. काही ठिकाणी शेतीचे बांध पावसाच्या पाण्याच्या प्रवाहाने पिकांसह व मातीसह अक्षरश: वाहून गेले आहे. येथील दादा बोबडे यांच्या शेतात काढायला आलेले भुईमूग पिक पाण्याच्या प्रवाहाबरोबर माती आल्याने जमीनीतच गाडले गेले. सध्या सुगीचे दिवस सुरू आहेत. हातातोडांशी आलेला शेतीमाल ताब्यात कसा घेता येईल यासाठी शेतकरी कुटुंबांची एकच लगभग सुरू आहे. त्यात मजूर वर्गाचा तुटवडा जाणवत आहे.
परिसरात दररोज मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने घेवड्याचे पिक तर गेलेच पण नवीन कांद्याच्या गेल्या दहा दिवसांपूर्वी केलेली लागण देखील वाया गेली. वाफ्यात साठलेल्या पाण्यामुळे रोपे कुजली. शासनाने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी.
-दादा बोबडे , शेतकरी खटाव