राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांचा आरोप
जयपुर: ईडी, सीबीआय किंवा अन्य सरकारी यंत्रणांचा धाक दाखवून संपुर्ण देशाला धमकावले जात आहे असा आरोप राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी केला आहे. कर्नाटकातील कॉंग्रेस नेते डी शिवकुमार यांना ईडीने नव्याने ज्या नोटीसा बजावल्या आहेत त्या अनुषंगाने प्रतिक्रीया देताना ते बोलत होते.
गेहलोत म्हणाले की जे निवडणुका जिंकतात किंवा सत्तेवर येतात त्यांनी मोठ्या मनाने वागले पाहिजे. मोदी सरकार तसे वागत आहे काय असा सवाल त्यांनी केला. त्यांनी संपुर्ण देश ईडी आणि सीबीआयच्या दबावात घेतला आहे. केवळ राजकारणीच नव्हे तर व्यापारी, उद्योजक या सर्वांनाच धमकावले जात आहे. त्यामुळे संपुर्ण देशात सध्या भीतीचे वातावरण आहे.
ते म्हणाले की वास्तविक देश आर्थिक संकटात आणि मंदीच्या वातावरणात सापडला असताना त्याकडे कोणतेही लक्ष न देता सरकारने हा भलताच उद्योग चालवला असल्याचा आरोपही त्यांनी केला. ते म्हणाले की आत्ता पर्यंत केवळ कर्जबाजारी शेतकरी आत्महत्या करीत होते पण आता लहान व्यापारी, उद्योजक आणि अन्य व्यावसायिक आत्महत्या करू लागले आहेत. वाहन उद्योगातील दहा लाख लोकांनी रोजगार गमावला आहे. देशातील मोठ्या कंपन्या बंद पडत आहेत. आता तर एका विख्यात बिस्कीट कंपनीनेही आपल्या दहा हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. ही सारी भीषण स्थिती आहे असे ते म्हणाले. या स्थितीचे सरकारला आकलनच होताना दिसत नाही. त्यांना काहीही कळत नाही असेच लक्षात येते आहे. लोकांच्या नोकऱ्या जात असल्याने देशात कायदा आणि सुव्यवस्थेचाही मोठा प्रश्न निर्माण होत आहे असेही त्यांनी म्हटले आहे.